बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेत सुरू असलेल्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी नगरसेवक रियाज किल्लेदार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीच्या राजकारणात गुंतणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेळगावच्या जनतेने मतदान करताना आपण कोणाला निवडून देत आहोत, याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन शेळके यांनी केले. “विदूषक निवडून देण्याऐवजी जबाबदार आणि सर्व समाजघटकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी निवडा,” असे त्यांनी सुनावले.
बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबतही शेळके यांनी भाष्य केले. बेळगावच्या मालकीचा कायदेशीर प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत, या विषयावर राजकीय भूमिका घेताना वस्तुस्थितीचे भान ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, किलेदार यांनी आपल्या मातृभाषेशी संबंधित असलेल्या उर्दू शाळा, शिक्षक भरती आणि भाषिक प्रश्नांवरही आवाज उठवावा, असा टोला शेळके यांनी लगावला. केवळ महापालिकेतील ठरावांवर राजकारण करण्याऐवजी जनतेच्या प्रत्यक्ष प्रश्नांवर काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
बेळगाव काँग्रेसची हीच भूमिका असेल, तर पक्षात काम करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपणच आपली भाषा आणि संस्कृती संपविण्याच्या दिशेने जात आहोत, याची जाणीव झाली नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असा इशाराही शेळके यांनी दिला.





