बेळगाव लाईव्ह:गेल्या जून महिन्यात काकती जवळील होनगा पुलावर घडलेल्या दोन ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींना वैद्यकीय खर्च देण्याबरोबरच अपघातातील स्वामीजींच्या दोन मृत भक्तांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी शिवापुर -सुतगट्टी (ता. जि. बेळगाव) येथील श्री श्री काडसिद्धेश्वर मठ सेवा समितीने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि कर्नाटकच्या राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवापूर येथील श्री श्री काडसिद्धेश्वर मठ सेवा समितीचे सेक्रेटरी महादेव इराप्पा जाबर यांच्या नेतृत्वाखालील स्वामीजींच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. तसेच आपल्या मागणीबद्दल त्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपालांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. कारमधून बेळगाव कडे येत असताना गेल्या 17 जून 2023 रोजी काकती जवळील होनगा पुलावर घडलेल्या दोन ट्रक (लॉऱ्या) आणि कारगाडी यांच्यातील अपघातात श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर जखमी झाले होते मात्र या अपघातात त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले त्यांचे दोन भक्त जागीच ठार झाले.
परखनहट्टी (ता. हुक्केरी) येथील 25 वर्षीय युवक पंचाक्षरी हिरेमठ आणि निपाणी नजीकच्या गावातील पांडुरंग जाधव अशी या दोन मृत भक्तांची नावे असून त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. अपघातानंतर स्वामीजींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले या उपचारासाठी बराच खर्च आला असून स्वामीजींना अधिक उपचाराची गरज आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच अपघातामुळे स्वामीजींसह त्यांच्या मृत भक्तांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आजवर झालेल्या उपचाराचा आणि यापुढील अधिक उपचाराचा वैद्यकीय खर्च सरकारने द्यावा. त्याचप्रमाणे मयत पंचाक्षरी हिरेमठ आणि पांडुरंग जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करण्यापूर्वी आज सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री श्री काळसिद्धेश्वर मठ सेवा समितीचे सिक्रेटरी महादेव जाबर व अन्य स्वामीजींनी आपल्या मागणी संदर्भात माहिती देताना अपघातातील जखमी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि त्यांच्या मयत भक्तांच्या कुटुंबीयांना सरकारी मदतीची किती गरज आहे ते स्पष्ट केले. श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी हिंदू धर्मासह गोमातेच्या संरक्षणासाठी अवरीत कार्य करत आहेत. सर्व गोष्टींचा त्याग करून आम्ही साधुसंत हिंदू धर्माचे रक्षण आणि संवर्धनासाठी आमचे संपूर्ण जीवन व्यतीत करत असताना आमची अपेक्षा असते की आम्हाला सरकारने तसेच सर्व हिंदू धर्मियांनी साथ द्यावी. आज प्रत्येक हिंदूने जागे झाले पाहिजे, गो-हत्या थांबलीच पाहिजे. यापूर्वी 25 वेळा आम्ही सरकार समोर शांतपणे आमच्या मागण्या मांडल्या आहेत मात्र यापुढे तसे होणार नाही, उद्या जर साधू-संत रस्त्यावर उतरले तर त्याच्या परिणामाची जबाबदारी सरकारवर असेल. सध्याचे मलीन राजकारण आणि स्वार्थी आमदार, खासदारांमुळेच आम्हाला हे करणे भाग पडणार आहे. कारण निवडणुकीवेळी हिंदू म्हणून हिंदुत्वासाठी हात उंचावणाऱ्या राजकीय नेत्यांनी आता आपले हात उचलले पाहिजेत.
हिंदुत्व फक्त राजकारणासाठी मर्यादित नको. जेंव्हा जेंव्हा हिंदुत्वाला विरोध होतो. त्यावर टीका होते, तेंव्हा नेतेमंडळींनी हिंदुत्वाच्या समर्थनात उभे ठाकले पाहिजे. मात्र आज हे घडताना दिसत नाही याचा आम्हा साधुसंतांना अतिशय खेद वाटतो असे सांगून जखमी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि त्यांच्या मृत भक्तांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे असे पत्रकार परिषदेत उपस्थित स्वामीजींनी स्पष्ट केले.