Friday, April 19, 2024

/

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांना एकजुटीने पिटाळून लावा : राजू शेट्टी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विकासाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावू पाहणाऱ्यांना भूमिपुत्रांनी एकजुटीने पिटाळून लावा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी आमदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सीमाभागातील शेतकऱ्यांना केले.

आज तालुका तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने बेळगुंदी येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सीमाभागातील शेतकऱ्यांवर या ना त्या कारणाने फिरविण्यात येत असलेला वरवंटा, सुपीक शेतजमिनी हडप करून या जमिनीवर रिंग रोड, बायपास, रेल्वे लाई,न सांडपाणी प्रकल्प यासारख्या प्रकल्पांचा घाट घालण्यासाठी आखण्यात आलेला डाव उधळून लावण्यासाठी आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, विकासाची खोटी स्वप्नं दाखवून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे काम विविध पक्षाच्या आणि आघाड्यांच्या सरकारने केले आहे. कोणाचेही सरकार असो त्यांनी वेगळे काहीच केले नाही. शेतकऱ्यांना भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल करून शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर विकासाचे तुणतुणे वाजवायचे, रोजगार निर्मितीची कारणे द्यायची आणि शेतकऱ्यांना कोंडीत पकडायचे असा गलिच्छ डाव सरकार आखात आहे. सरकारच्या माध्यमातून सरकारी भूमी अधिग्रहणातून आपला फायदा करून घेणाऱ्या बांडगुळांची संख्यादेखील काही कमी नाही. परंतु या गर्तेत शेतकरी एकटा पडतो. आणि दुर्दैवाने शेतकऱ्याच्या सोबतीला दुसरा शेतकरीही उभा राहात नाही. सरकारी कुटील डाव हाणून पाडायचे असतील तर शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.Raju shetty

 belgaum

आज ज्याची शेतजमीन जाणार आहे त्याची अवस्था दुसरा शेतकरी निमूटपणे पाहत राहतो. मात्र आज समोरचा शेतकरी जात्यात असेल तर आपण सुपात आहोत हि बाब प्रत्येक शेतकऱ्याने ठामपणे आपल्या मनाला सांगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने आम्ही सांगतो तोच कायदा संसदेत मंजूर झाला पाहिजे, असा ठाम निर्धार करणे गरजेचे आहे. जनमताचा रेटा आणून देशाच्या राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या बाजूने कायदा करावा असा आदेश गावसभेच्या वतीने ठणकावून सांगितले तर भविष्यात शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील. शेतजमिनी हडप करण्याच्या सुरुवातीच्या प्रक्रियेपासूनच शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी एकजुटीने पिटाळून लावा, शेतकऱ्यांची जमीन हडप करून गुलाम बनवू पाहणाऱ्यांना आपल्या एकजुटीची ताकद दाखवा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

मेळाव्याच्या सुरुवातीला राजू शेट्टी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आले. माजी आमदार व म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, लक्ष्मणराव होनगेकर, चंदगड ता. पं. चे माजी सभापती जगन्नाथ हुलजी, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, समिती नेते आर.एम. चौगुले माजी जि.पं. सदस्या सरस्वती पाटील आदींसह बेळगाव शहर-तालुक्यातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऍड. एम. जी. पाटील यांनी सुत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.