बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावातील कचरा विल्हेवाट प्रकल्पामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवून कचरा डेपो इतरत्र हलवावा, या मागणीसाठी आज गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कचरा डेपोमुळे पसरणाऱ्या दुर्गंधी आणि आजारांमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुरमुरी येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने आज नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करावा, याची आठवण करून देण्यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे ग्रामस्थांतातून सांगितले गेले. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून, प्रत्यक्षात मात्र कोणतीही अंमलब्यावणी झालेली नाही.

गेल्या २० वर्षांपासून या कचरा प्रकल्पामुळे गावात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्बत आतापर्यंत अनेकदा तपासणी होऊन अहवाल सादर करण्यात आले, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिक नेते नागराज जाधव यांनी केला आहे.
परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेला हा कचरा प्रकल्प तातडीने बंद करावा, अन्यथा आगामी काळात संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी तुरमुरी गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




