बेळगाव लाईव्ह : केंद्र व राज्य शासनाच्या वीज खाजगीकरण धोरणाचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
वीज क्षेत्रातील कॉर्पोरेट धोरणांवर टीका करताना शेतकरी नेते चूनप्पा पुजाळी यांनी सरकारवर निशाणा साधला. सुरुवातीला मोफतचे आमिष दाखवून नंतर ग्राहकांची आर्थिक लूट करण्याचा खाजगी कंपन्यांचा डाव वीज क्षेत्रातही राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विजेसाठी प्रस्तावित स्मार्ट कार्ड आणि जीपीएस प्रणाली लागू झाल्यास खात्यातील पैसे संपताच वीज पुरवठा खंडित होईल, ज्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेचे जगणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना या धोरणावरून थेट इशारा दिला आहे. सरकारने खाजगीकरणाची निविदा प्रक्रिया तातडीने रद्द न केल्यास संपूर्ण राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्ग रोखतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




