Saturday, April 27, 2024

/

स्वाभिमान असेल तर शिवभक्तांनी लोकप्रतिनिधींना जरूर जाब विचारावा : कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले असून बेळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि मराठी समाजाची मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे लोकप्रतिनिधींकडून अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. मराठी माणसाची अस्मिता आणि दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरून भावनिक मुद्द्याला हात घालत अनेक राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यात धन्यता मानत आहेत. याविरोधात रमाकांत कोंडुसकरांनी एल्गार पुकारला असून गेल्या आठवड्यात त्यांनी दक्षिण आणि ग्रामीण भागात ‘शिवसन्मान पदयात्रेचे’ आयोजन केले.

छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि भगवा ध्वज यावरून सुरु असलेले अवमानाचे राजकारण थांबविण्यासाठी आणि मराठी माणसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आयोजिलेली शिवसन्मान पदयात्रा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासाही केला. शिवसन्मान पदयात्रेत निर्माण करण्यात आलेल्या अडचणी, जाणीवपूर्वक करण्यात आलेली आडकाठी, विरोध या सर्व गोष्टींना न जुमानता मराठी जनतेचा सातत्याने होणारा अवमान थांबविण्यासाठी आपण हि शिवसन्मान पदयात्रा आयोजिली, आणि ती यशस्वीही केली, असे कोंडुसकर म्हणाले.

सध्या येळ्ळूर येथील राजहंसगडावरून सुरु असलेल्या राजकारणासंदर्भातही त्यांनी रोखठोख प्रतिक्रिया देत स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. मराठी माणसांच्याच मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजहंसगडावर राजकारण करण्यासाठी वेळ आहे, तर गेल्या ८ वर्षांपासून बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेली शिवसृष्टी अद्याप जनतेसाठी खुली का करण्यात आली नाही? गोवावेस परिसरात खाऊ कट्टा उभारला जाऊ शकतो, रस्ते उखडून रातोरात दुसरे रस्ते बनवून जनतेच्या पैशांचा चुराडा केला जातो तर मग  एकदा उद्घाटन होऊनही अद्याप शिवसृष्टीचे दरवाजे बंद का? मराठी माणसाची मते मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर राजकारण करून मराठी माणसांच्या भावनांशी खेळ केला जातो, शिवभक्तांच्या आडून राजकारण करून, त्यांच्याच मतावर निवडून येऊनही वारंवार शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर राजकारण कशासाठी? असे रोखठोख सवाल त्यांनी उपस्थित केले.Ramakant konduskar

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प रेल्वेस्थानकाच्या गोडाऊनमध्ये लपविण्यात आलेल्या मुद्यावरही त्यांनी ठाम भूमिका घेतली. प्रशासनाने ८ दिवसांची मुदत मागितली असून याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शिल्प बसविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. शिवाय जीव गेला तरी चालेल पण रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविणाराच अशी आग्रही भूमिका रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली.

याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यावरदेखील कोंडुसकरांनी प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधानांची स्थानिक राजकारण्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांना सीमाभागातील परिस्थितीचा अंदाज होता. मात्र जाणीवपूर्वक त्यांनी आपल्या भाषणात मराठीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वगळले. रोड शो दरम्यान शिवाजी महाराजांचा देखावा साकारला गेला. मात्र, तरीही पंतप्रधानांच्या लक्षात हि बाब आली नाही आणि जाणीवपूर्वक त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणे टाळले, हा समस्त शिवभक्तांच्या अवमान असल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले. बेळगावमधील शिवभक्तांना मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि शिवाजी महाराजांचा आदर असेल आणि आस्था असेल तर याचा जाब त्यांनी लोकप्रतिनिधींना जरूर विचारावा, असेही रमाकांत कोंडुसकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.