Friday, April 26, 2024

/

वर्चस्वाच्या लढाईतून झाले ‘ते’ दोन खून!

 belgaum

बेळगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यात खून, हाणामाऱ्यांच्या घटना घडल्यामुळे बेळगाव शहर, तालुका आणि उपनगरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्य, अनैतिक प्रकरणे, ऑनर किलिंग, मालमत्तेच्या वादासह अलीकडे गॅंगवॉर आणि सोशल मीडियावर रिल्स तयार करण्याच्या नादात चिल्लीपिल्ली कंपनीच्या नव्याने उदयाला येणाऱ्या गॅंग बेळगावसाठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत.

गुरुवारी सुळेभावी परिसरात झालेल्या दोन खुनानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावेळी शहर पोलीस आयुक्त रवींद्र गडादि यांनी दोन पोलीस हेडकॉन्स्टेबलना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बडतर्फही केले. हळहळू या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागत असून सुळेभावित झालेल्या खुनामागे सोशल मीडियाचे खूळ आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात येणाऱ्या रिल्स कारणीभूत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सुळेभावी येथे झालेले खूनदेखील अशामधीलच एक उदाहरण आहे. खून करण्यात आलेल्या दोन्ही मृत तरुण सोशल मीडिया फॅन होते. इंस्टाग्रामवर आपल्या राऊडी अंदाजात रिल्ड पोस्ट करण्यामुळे दोघेही चर्चेत होते. यामुळे चिडलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचा काटा काढला असावा अशी चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी रणधीर उर्फ महेश मुरारीने “उग्राम” चित्रपटातील डायलॉगसोबत रिल्स पोस्ट केले होते. याचसोबत प्रकाश पाटील यानेही हातात चाकू घेऊन केजीएफ चित्रपटाच्या डायलॉगसह रील बनवली होती. महेश आणि प्रकाश कन्नड चित्रपटातील पात्रांची नक्कल करून रिल्स पोस्ट करायचे. याच इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून मारेकऱ्यांना आव्हान दिल्याच्या रागातून सदर खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 belgaum

मृत महेश आणि संशयित खुनी शशिकांत मिसाळे हे दोघेही एकाच टोळीतील मित्र होते. मात्र क्षुल्लक कारणावरून दोन्ही कट्टर मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. महेश आणि शशिकांत गटात वर्चस्व वाढवण्यासाठी आटापिटा सुरू झाला. महेश हा गोकाकच्या टायगर गँगशी संबंधित होता. टायगर ग्रुपमधील सदस्यांना अटक झाल्यानंतर महेश हा सुळेभावी येथे वास्तव्यास होता. याचवेळी वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावून घेऊन शशिकांत मिसाळे टोळीने महेश मुरारी आणि प्रकाश पाटील यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला.

सुळेभावित झालेल्या या खूनप्रकरणांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बसलेला फटका प्रत्येकाच्या निदर्शनात आला आहे. सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करण्याच्या नादात दोघांना आपला जीव गमवावा लागला असून विकसनशील देशातील तरुणांची हि परिस्थिती खरोखरच दुर्दैवी म्हणावी लागेल. सोशल मीडियावर स्टेटस, स्टोरी, रिल्स तयार करून एखाद्या चित्रपटातील भंकस डायलॉग किंवा शिवीगाळ केलेला डायलॉग असलेल्या व्हिडिओतून अधिराज्य गाजविण्याचा प्रकार अलीकडे जोरदार सुरु आहे. चाकू, तलवार, गावठी पिस्तूल यासह इतर हत्यारे हातात घेऊन तयार केलेल्या व्हिडिओसोबत जोरदार कॅप्शन देत गॅंग प्रमुखाची कॉलर तथाकथित फॅन्समध्ये टाईट होते असा समज ठेवून स्वतःच्या आयडीपुढे एखादे थिल्लर नाव देत गुंड असल्यासंदर्भात फुटकळ अभिमान बाळगण्यात धन्यता मानण्यात येत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.