अतिवृष्टी तसेच सततच्या परतीच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात अतोनात हानी झाली असून ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात 899 घरांची पडझड झाली आहे. तसेच 179 हेक्टर बागायत पिकाचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामातील पावसासह परतीच्या पावसामुळे यंदा अतोनात हानी झाली आहे. जिल्ह्यात घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली असून त्याचा तपशील शासनाला सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबर ही अखेरची डेडलाईन जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
घराच्या पडझडीचा तपशील संग्रहित करताना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पावसाचा वाढलेला कालावधी अतिवृष्टी व त्यातून होणाऱ्या हानीचा तपशील वेळेत सादर करण्यासाठी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती. आता एकंदरीत तपशील वेळेत सादर करून भरपाई वेळेत मिळवून देण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये पावसामुळे 899 घरांची पडझड होण्याबरोबरच पावसामुळे घर पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. या खेरीज पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन एकाचा मृत्यू झाला असून पावसामुळे 6 जनावरे दगावले आहेत. ऑक्टोबर मधील पावसामुळे जिल्ह्यातील 179 हेक्टर बागायत पिकाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान अतिवृष्टी पुरात वाहून गेल्या 1 जून ते 12 ऑक्टोबर दरम्यान 8 जणांचा बळी गेला आहे. यापैकी सात जणांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख प्रमाणे 35 लाख रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत, तर एका व्यक्तीचा अर्ज विचाराधीन आहे. याव्यतिरिक्त चालू महिन्यात म्हणजे 1 ते 12 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसामुळे चार घरे पूर्णपणे पडली आहेत, तर 368 भागश: तसेच 527 घरांची अंशतः पडझड झाली आहे.