Thursday, March 28, 2024

/

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विचारही ‘विधायक’ व्हावेत!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या श्री शिवजयंती उत्सवाला आणि श्री गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर आता बेळगावमध्येही भव्य अशी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. हि मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर, तालुका आणि आसपास परिसरातील लाखो गणेशभक्त बेळगावमध्ये दाखल होतात. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती वेळेत मिरवणुकीत दाखल न झाल्याने परगावाहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याचे अलीकडे आढळून आले आहे.

प्रशासन आणि पोलीस विभाग गणेशोत्सवात आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत गणेशोत्सव मंडळांना सूचना देतात. यामध्ये श्रीमूर्तीच्या उंचीपासून, साउंड सिस्टम, मंडपाचे आकार, विसर्जनादरम्यान घ्यावयाची खबरदारी यासारख्या अनेक सूचना करण्यात येतात. प्रशासन आणि पोलीस विभागावरदेखील संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी असते. या दृष्टिकोनातून उत्सवकाळात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी प्रशासन देखील आपल्यापरीने खबरदारी घेत असते. मात्र अलीकडे प्रशासन आणि पोलिसांच्या कोणत्याही सूचनांना दाद न देण्याचे काही मंडळांनी ठरविले असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरात श्रीमूर्ती विसर्जनासाठी मुबलक सोयी सुविधा आहेत. त्यामानाने आपले शहर हे छोटे आहे. आपल्या शहरात श्रीमूर्ती विसर्जनादरम्यान श्रीमूर्तीच्या उंचीमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. उंचच्या उंच श्रीमूर्ती विसर्जनासाठी लागणारा वेळ, अधिक उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी करावी लागणारी कसरत, विसर्जनासाठी असणारी अपुरी तलावाची व्यवस्था, तलावाची अपुरी खोली आणि रुंदी या साऱ्याचा विचार करून सुरुवातीलाच प्रशासनाकडून श्रीमूर्ती उंचीबाबत गणेशोत्सव मंडळांना सल्ला-सूचना देण्यात येतात. मात्र यादरम्यान गणेशोत्सव मंडळांकडून वाद निर्माण होतात. आपण ज्या भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतो त्याच भक्तिभावाने आणि परंपरा जप्त श्रीमूर्ती विसर्जन देखील होणे आवश्यक आहे. शेवटी उत्सव आणि परंपरा या श्रीमूर्तीच्या उंचीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण आहेत.

 belgaum

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव काळात अनेक भक्तिगीते श्रीमंडपात लावली जातात. मात्र विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाकडून डॉल्बीचा वापर टाळण्याच्या सूचना करूनही काही मंडळांकडून या सूचनेला फाटा देत मर्यादेपेक्षा अधिक डेसिबलच्या डॉल्बीचा वापर केला जातो. एकीकडे विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणारे आपले बेळगाव अशा काही विघ्नसंतोषी लोकांमुळे टीकेचा धनी होत चालला आहे. मिरवणुकीत केले जाणारे हिडीस नृत्यप्रकार आणि कर्णकर्कश्श आवाज यामुळे गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले आहे. श्री गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील उद्देश या साऱ्याचा विचार गणेशोत्सव मंडळांनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे.Basav coloney ganesh

विसर्जन मिरवणूक हल्ली २४ तासांहून अधिक काळ सुरु राहते. यादरम्यान अनेक अडचणींचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. बेळगावमधील श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविक बेळगावमध्ये एकत्रित येतात. परगावाहून मोठ्या संख्येने नागरिक बेळगावमध्ये दाखल होतात. विसर्जन मिरवणुकीचे उदघाटन जरी वेळेत झाले तरी अनेक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीत वेळेत सहभागी होत नाहीत. परिणामी मिरवणूक लांबली जाते. मिरवणूक मार्गावरील अनेक मार्गांवर तासनतास गणेशमूर्ती न आल्याने भाविक ताटकळतात. तसेच मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडते. यामुळे काही कार्यकर्त्यांच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण बेळगावच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर बोट करण्याची वेळ आली आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.

बेळगावमधील मिरवणूक हि शिस्तबद्ध, विधायक, परंपरेनुसार पार पाडण्यासाठी प्रशासन, पोलीस विभाग यासह गणेशोत्सव महामंडळ देखील प्रयत्नशील असते. आपल्या शहरातील उत्सव हा इतर शहरांसाठी आदर्श आणि विधायक ठरावा, उत्सवाला उत्सवाचेच स्वरूप कायम आणि अबाधित राहावे, कोणतेही गालबोट न लागता आदर्श उत्सव म्हणून तसेच आजतागायत असलेली बेळगावची परंपरा पुढील काळातही अशीच नावारूपास येण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आणि मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले विचारही विधायक करणे हि काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.