Friday, April 26, 2024

/

राजकीय आढावा: जेंव्हा कर्नाटकातील राजकारण्यांच्या घशात गेले त्यांचेच पाय

 belgaum

सरत्या वर्षी कर्नाटकातील प्रख्यात सार्वजनिक व्यक्तींना अर्थात राजकारणी व्यक्तींना ‘स्लिप ऑफ द टँग’ सिंड्रोमचा सामना करावा लागला आणि अनेकदा त्यांचे शब्द इतके अडचणीचे ठरले की त्यांचेच पाय त्यांच्या घशात गेले.
पाहुयात अनुक्रमे काय काय आणि कसे घडले…..कोण कसे पचकले आणि त्यांनाच महागात ही पडले.
बसवराज बोम्मई
कर्नाटकच्या किनारपट्टीवर ‘नैतिक पोलिसिंग’च्या वारंवार घटना घडत असताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी एक पंक्ती सुरू केली. भाजपचे आमदार उमानाथ कोटियन यांनी दोन आरोपींना पोलिस ठाण्यातून पळवून नेल्याबद्दल पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया मागितली तेव्हा बोम्मई यांनी त्यांचा बचाव केला, ते म्हणाले, “जर भावना दुखावल्या गेल्या असतील, तर प्रतिक्रिया होणे निश्चितच आहे.” हे विधान नैतिक पोलिसिंगचे समर्थन असल्याचे आरोप झाले. यानंतर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि सरकारवर तीव्र आघात झाले.
के आर रमेश कुमार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के आर रमेश कुमार यांनी विधानसभेत ‘जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो, तेव्हा झोपून त्याचा आनंद घ्यावा,’ असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. पूरग्रस्तांवर बोलण्यासाठी आमदारांनी आणखी वेळ मागितला असताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अरग ज्ञानेंद्र
कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी म्हैसूर गँगरेप पीडितेवर बोलताना चांगलाच रोष ओढवून घेतला. जेव्हा ते म्हणाले की तक्रारकर्त्याने अर्थात बलात्कारित महिलेने निर्जन ठिकाणी जायला नको होते. जेव्हा विरोधी पक्ष चौकशीची मागणी करत होते, तेव्हा ते म्हणाले, “तिथे (म्हैसूरमध्ये) बलात्कार झाला आहे, पण काँग्रेस माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे”.या विधानांनी बलात्काराच्या गंभीर प्रकाराकडे राजकारणी कोणत्या नजरेतून बघतात हे स्पष्ट झाले.
हंसलेखा
संगीतकाराने पेशावर मठाचे दिवंगत विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्यावर भाष्य केले, की ते एका दलिताच्या घरी गेले होते, “ते तिथे बसले होते, पण त्याना जर कोंबडी किंवा कोकरू दिले तर त्यांनी खाल्ले असते का?’’ हे विधान मोठे वादळी ठरले.
डॉ के सुधाकर
आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी निम्हन्स येथे भाषण देताना सांगितले की, भारतातील अनेक आधुनिक महिलांना अविवाहित राहायचे आहे आणि त्यांनी लग्न केले तरी त्यांना मुलांना जन्म द्यायचा नाही, तर सरोगसीला प्राधान्य दिले जात आहे.या विधानाने महिला संघटनांच्या वतीने संताप आणि नाराजी व्यक्त झाली.
नलिन कुमार कटील
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना हुबळी येथील भाजपच्या कार्यक्रमात ‘ड्रग अॅडिक्ट’ आणि ‘ड्रग पेडलर’ असे संबोधले. राहुल गांधी तुरुंगात असायला हवे होते आणि केपीसीसीचे अध्यक्षही जामिनावर बाहेर आहेत, असेही कटील म्हणाले.याबद्दल अखेर भाजप नेत्यांना माफी मागावी लागली होती.
के एस ईश्वरप्पा
आरडीपीआर मंत्री म्हणाले की, पूर्वी केरळमध्ये जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एक युनिट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला. आता त्यांची ताकद वाढल्याने परिस्थिती बदलली आहे. “जर कोणी भाजप किंवा आरएसएसच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्याच काठीने तोंड देण्यास सांगतो,” या विधानाने आर एस एस च्या प्रतिमेला तडे गेले होते.
तेजस्वी सूर्या
उडुपी येथील श्री कृष्ण मठ येथे आयोजित कार्यक्रमात, बेंगळुरू दक्षिण भाजप खासदाराने “हिंदू धर्म सोडून गेलेल्यांच्या” पुनर्परिवर्तनावर वादग्रस्त विधान केले होते. भारताच्या इतिहासात विविध सामाजिक-राजकीय-आर्थिक कारणांमुळे ज्या लोकांनी आपला मातृधर्म सोडला आहे, जे हिंदू धर्माच्या बाहेर गेले आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणले पाहिजे, असे खासदाराने म्हटले होते. त्यांनी असेही म्हटले होते की मठ आणि मंदिरांना पुनर्परिवर्तनाचे उद्दिष्ट असावे. टीका झाल्यानंतर त्यांनी बिनशर्त आपले वक्तव्य मागे घेतले.
चेतन अहिंसा
अभिनेता चेतनचे ट्विट, “ब्राह्मणवाद म्हणजे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्वाच्या भावनेचा निषेध. आपण ब्राह्मणवाद उखडून टाकला पाहिजे…” त्यामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. ब्राह्मणवादाने बसव आणि बुद्धांच्या विचारांचा घात केला आणि बुद्धाने ब्राह्मणवादाशी लढा दिला असे त्यांनी म्हटले होते.
उमेश कत्ती
अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांनी ज्या कुटुंबांकडे टीव्ही आणि दुचाकी आहेत त्यांनी त्यांचे बीपीएल कार्ड सरेंडर करावे, असे जाहीर केल्यावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यावरून वाद निर्माण झाला , विरोधकांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
सीटी रवी
इंदिरा कँटीनचे नाव बदलून ‘अन्नपूर्णेश्वरी कँटीन’ ठेवण्याबाबत आग्रही असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी ‘काँग्रेसला आपल्या कार्यालयात इंदिरा कँटीन किंवा नेहरू हुक्का बार उघडू द्या…’ असे वक्तव्य करून वादाला निमंत्रण दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.