Saturday, April 20, 2024

/

समितीला पाण्यात पाहणाऱ्यांना मराठी भाषिकांची चपराक –

 belgaum

लोकसभेची ही पोटनिवडणूक आम्ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या स्वाभिमानासाठी लढविली आहे. म. ए. समितीसाठी ही निवडणूक म्हणजे लोकेच्छा दाखविण्यासाठीचे फक्त एक माध्यम आहे असे सांगून समितीला पाण्यात पाहणाऱ्यांना या निवडणुकीद्वारे मराठी भाषिकांनी चांगली चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया बेळगाव लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी दिली.

टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असताना पत्रकारांनी छेडले असता शुभम शेळके यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, अद्याप 2 -1 लाख मतांची मोजणी व्हावयाची आहे. त्यामुळे यापेक्षाही जास्त मते मिळतील अशी अपेक्षा आहे. मुळातच समितीला आजपर्यंतच्या इतिहासात जी जास्तीत जास्त 1 लाख 8 हजार मते मिळाली होती त्यापेक्षा जास्त मते घेऊन आम्ही नवा विक्रम करत 124 648 मत मिळवली आहेत हा आमचा नैतिक विजय तेंव्हाच झाला जेंव्हा डाॅ. आंबेडकर जयंती दिवशी एका कन्नड भाषिक कुटुंबाने माझ्या विजयाची भावना व्यक्त केली. हीच भावना मतांच्या स्वरूपात मराठीसह सर्व भाषिक लोकांनी मला मतदान करून दाखवून दिली आहे.

आम्ही ही निवडणूक मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या स्वाभिमानासाठी लढविले आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही नामी संधी होती आणि त्यासाठी मराठी माणूस उत्साहाने आणि ज्या तळमळीने उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. त्यावरून दिसून आले की कोणत्याही आमिषाला बळी न पडता मराठी माणूस हा फक्त अस्तित्वासाठी लढा देतो आहे, असे शेळके म्हणाले.

ही निवडणूक लढविण्याचा आमचा उद्देश लक्षात घेता आणि एकंदर मतदान पाहता आमचा मोठा विजय झाला आहे असे म्हणायला हवे. यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या अहंकाराला कुठेतरी तडा गेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला जे पाण्यात पाहतात त्यांना या निवडणुकीद्वारे मराठी जनतेने चांगलीच चपराक दिली आहे, असेही शुभम शेळके यांनी सांगितले.

मुळात सदर निवडणुकीतील हार-जीत आमच्यासाठी महत्त्वाची नव्हती. मराठी भाषिकांचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवली. सदर निवडणूक लढविण्यासद्वारे आम्ही एक ठिणगी टाकली आहे. आता ती तेवत ठेवणे हे आमचे ध्येय असणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समिती भविष्यात आणखी प्रखरतेने कार्यरत राहणार आहे. निवडणूक संपली तरी लढा संपलेला नाही अजून महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.Shubham

असे आहे शेळके यांचे यश

या निवडणुकीतील आमच्या कामगिरीचा पुढील निवडणुकांवर परिणाम होणार असे म्हणण्यापेक्षा यामुळे मराठी माणसांची एकजूट टिकून राहणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी निवडणुका हा फक्त लोकेच्छा दाखविण्याचे माध्यम आहे. सीमाप्रश्न आणि मराठी माणसावर होणारा अन्याय थांबविणे हा आमचा मूळ उद्देश असणार आहे. निवडणुकीपेक्षा या लढ्याला अधिक बळ कसे येईल यावर आमचे लक्ष राहणार आहे, असेही शुभम शेळके यांनी शेवटी सांगितले.

समितीने दक्षिण बेळगाव मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली भाजपला 53226 तर शेळके यांना 44950 मते पडले.सत्ताधारी भाजपला आटा पिटा करत केवळ 8300 मते समितीपेक्षा अधिक मिळवता आली हा देखील एक प्रकारे बेळगाव दक्षिण मधील समितीचा नैतिक विजय आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात तिन्ही पक्षांनी जवळपास समान मते घेतली काँग्रेसच्या विद्यमान आमदार आणि भाजपची मोठी यंत्रणा असताना शुभमने मारलेली 45536 मतांची घोडदौड आगामी विधानसभा तालुका जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रीय पक्षांची झोप उडवणारी आहे. ग्रामीण मध्ये भाजपला 47668 तर कॉंग्रेसला 47796 मते मिळाली.

बेळगाव उत्तर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती संपली अशी भाषा करणाऱ्या लोकप्रतिनिधीला वठणीवर आणण्यासाठी,मनपावर मराठी सत्ता आणण्यासाठी 24594 मते पुरेशी आहेत अशी भावना व्यक्त होत आहे.उत्तर मध्ये  काँग्रेसला 51427भाजपला 38668 मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.