Saturday, April 27, 2024

/

विविधता, नाविन्य, परिश्रम या त्रिसूत्रीने यश गाठलेल्या महिला उद्योजिका

 belgaum

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे” असे म्हणतात. सौ. आशा नाईक, यांच्या कर्तृत्वाचा हाच कानमंत्र असावा! त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा हा एक छोटासा आढावा. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि विविधतेत कलात्मकता शोधात यशाचा मार्ग गाठलेल्या बेळगावच्या महिला उद्योजिका सौ. आशा नाईक यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने केलेली बातचीत –

दक्षिण कर्नाटकातील चिकमंगलोर या गावात जन्मलेल्या आणि त्याच गावात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण बंगळूर येथे पूर्ण केलेल्या सौ. आशा नाईक या बेळगावमधील एक यशस्वी महिला उद्योजिका ठरल्या आहेत. बेळगावमधील तेजस्वी नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या बेळगावमध्येच स्थायिक झाल्या. आणि आपला संसार सांभाळता सांभाळता विविध प्रसंगांना सामोरे जाऊन पतीच्या सोबतीने अनेकविध व्यवसाय त्यांनी केले. अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे प्रत्येक व्यवसायात दिवसेंदिवस यश संपादन केले.

विविधता, नाविन्य, अहोरात्र परिश्रम ही यशाची त्रिसूत्री सांभाळत पॉलिस्टर साड्या, सेंद्रीय शेती (Organic Farming), रेशमाच्या किड्यांचे उत्पादन (Sericulture), फुलझाडांचे उत्पादन (Floriculture), पुष्परचना, भाजी उत्पादन, गूळ, हळद उत्पादन, अग्निहोत्र प्रचार, विविध महिला संघटनेत सक्रिय सहभाग, विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण असे अनेक व्यवसाय आणि जबाबदाऱ्या त्यांनी मोठया उत्साहाने सांभाळल्या आहेत.Asha naik

 belgaum

आशा नाईक यांच्या कर्तृत्वाची दखल भारतातील विविध संस्थांनी वेळोवेळी घेऊन त्यांना सन्मानित केले आहे. अस्पी फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी, आविष्कार संस्थेकडून यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच Vibrant Gujarat या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर शेतकऱ्यांना संबोधित करण्याची संधी ही त्यांना मिळाली आहे.

अनेक महिला उद्योजिकांना त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आज बेळगावात त्या एक नावजेल्या पुष्परचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. शुद्ध भाज्या आणि धान्य लोकांना मिळावे या हेतूने त्या आपले छोटेखानी दुकान आपल्या घरी दर सोमवारी आणि गुरुवारी चालवतात. हे सर्व करत असतानाच त्यांनी आपल्या पतीसोबत – अग्निहोत्र आणि सेंद्रीय शेती पद्धतीच्या प्रचारासाठी भारतभर २७००० किलोमीटरचा प्रवास करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.Asha naik

सध्याच्या युगात तरुणींनी घर-संसार, चूल – मूल या सर्व गोष्टी सांभाळत, प्रत्येक गोष्टीत संधी शोधून त्या संधीचे सोने करावे. निसर्गाने महिलांना नाजूकतेबरोबर कणखरपणा आणि सहनशक्ती दिली आहे. या दैवी देणगीचा आपण प्रत्येकाने योग्य त्यावेळी योग्य त्याठिकाणी वापर करून आपल्या आयुष्यात मोठे व्हावे, आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा सल्ला त्या तरुण युवती आणि महिलांना देतात.

आशा नाईक यांचा आजपर्यंतचा अनुभव हा नक्कीच प्रेरणादायी आहे, त्यांच्या या वैविध्यपूर्ण प्रयत्नांना टीम ‘बेळगाव लाइव्ह’चा सलाम आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानुरकर-सांबरेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.