Friday, March 29, 2024

/

तुरमुरी ग्रामस्थ अडकलेत कचऱ्यात सोडवणार कोण?

 belgaum

राजकीय स्वार्थासाठी कचरा डेपोला विरोध करून खुर्चीत बसल्यावर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकारणी व्यक्तींमुळे 2007 पासून बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावचे ग्रामस्थ कचऱ्यात अडकले आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी बेळगाव मोठ्याप्रमाणात विकासाची वाट चोखाळत आहे मात्र वेगवेगळी आव्हाने बेळगाव महानगरपालिकेसमोर उभी आहेत. घन कचरा व्यवस्थापनाचे एक मोठे आव्हान बेळगाव महानगरपालिकेसमोर आहे.

सध्या असलेल्या तुरमुरी येथील कचरा डेपोची क्षमता पूर्णपणे भरलेली आहे. ग्रामस्थांचा विरोध आहे त्यामुळे स्वतंत्र दुसरी कचरा डेपोसाठी जागा शोधण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या समोर आहे. बेळगाव शहराची लोकसंख्या आठ लाखाच्या घरात जाऊन पोहोचली आहे. बेळगाव शहर आणि कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा रोज 240 ते 250 टनाच्या घरात जाऊन बसत आहे. तुरमुरी गावच्या हद्दीत निर्माण करण्यात आलेल्या कचरा डेपोत कचरा पाठवण्यात येतो. हा कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया योग्य रीतीने होत नसल्याची तक्रार तुरमुरी ग्रामस्थ करतात. यामुळे या गावात आजारांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच सुरुवातीपासूनच तुरमुरी ग्रामस्थांनी कचरा डेपो इतरत्र हलवावा अशी मागणी केली आहे. ओला आणि सुका कचरा येथे फेकला जातो कुजल्यानंतर त्या कचऱ्यातून घाणेरडी वास निर्माण होते. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या अडवून नागरिकांनी वारंवार आपल्या विरोध दर्शवला आहे.

ग्रामस्थांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. कचऱ्याची वास येत असल्यामुळे नेहमीच नाके बंद करण्यासाठी कपड्याचा वापर करून येथील नागरिकांना जगावे लागते. गावच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. बाहेरील लोक आणि पाहुणे मंडळी तुरमुरी गावात यायला बघत नाहीत. तसेच त्या गावात आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत अशी माहिती मिळते.

 belgaum

2007 मध्ये महानगरपालिकेने एका एनजीओ सोबत करार करून कचरा व्यवस्थापनासाठी तुरमुरी येथे कचरा डेपो सुरू केला. घन कचरा वर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणे आणि ज्या कचर्‍यावर प्रक्रिया होत नाही तो खड्डे काढून बुजवणे हे काम त्या एनजीओला देण्यात आलेले असले आणि 2024 पर्यंत हा करार असला तरी आता तुरमुरी येथील कचरा डेपो च्या जागेतील क्षमता संपली आहे. त्यामुळे 240 ते 250 टन कचऱ्यावर व्यवस्थापन प्रक्रिया करता येत असली तरी त्यापेक्षा दुप्पट कचरा जमत असल्यामुळे बाकीचा कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्‍न महानगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर विचार करून दुसरीकडे कचरा डेपो स्थापन करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असला तरी दुसरीकडे जागा मिळणे कठीण आहे.

मच्छे जवळील नावगे येते 2011 पासून कचरा डेपो सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर गावातील नागरिकांनी तसेच संती बस्तवाड, कर्ले या भागातील लोकांनी जोरदार विरोध केल्यामुळे महानगरपालिकेला प्रस्ताव मागे घ्यावा लागला आहे. इतर भागातही बेळगावचा कचरा घेण्यास कोणतेही गाव तयार नाही. त्यामुळे बेळगावच्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न महानगरपालिकेसमोर उभा आहे. आत्तासुद्धा कचरा डेपोसाठी जागा निवडीची प्रक्रिया सुरूच आहे. मात्र जागा जागा मिळत नाही हे वास्तव आहे.

राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी तुरमुरी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला आहे. स्थानिकांचा पाठिंबा मिळवून राजकीय खुर्ची मिळविण्याचे प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झाले मात्र कचरा डेपोत येतच राहिला असे चित्र आहे. सध्या बेळगाव ग्रामीणच्या आमदार असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध आंदोलनात सहभाग घेऊन नागरिकांच्या भावनिक मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न केला व त्या यशस्वी झाल्या. यापूर्वी आमदारकी मिळवलेले संजय पाटील हे भाजपचे उमेदवारही कचरा डेपोच्या आंदोलनात सहभागी होत होते, मात्र त्यांच्या काळात न आता लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या काळात कचरा डेपो हटला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.