बेळगाव लाईव्ह : शनी मंदिरापासून उषाताई गोगटे शाळेपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे हे बॅरिकेड्स वारंवार रस्त्यावर कोसळत असल्याने वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सार्वजनिक व वाहनांची गर्दी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने पोलिस विभागाकडून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शनी मंदिर ते उषाताई गोगटे शाळा या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावण्यात आले. मात्र, हे बॅरिकेड्स व्यवस्थित सुरक्षितपणे उभे करण्यात आले नसल्याने सध्या तेच वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

जोरदार वारा सुटला की रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेले बॅरिकेड्स अचानक कोसळतात. गर्दीच्या वाहतुकीतून मार्ग काढताना अचानक समोर बॅरिकेड पडल्यामुळे दुचाकीस्वारांचा वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता आहे. यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्सच आता वाहतूक सुरक्षेसाठी धोका बनले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच जोरदार वारा असताना या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन बॅरिकेड्स मजबूतपणे उभे करण्याची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी बॅरिकेड्सची आवश्यकता नाही, तेथील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी स्थानिक वाहनधारकांनी केली आहे.





