बेळगाव लाईव्ह : बेळगाव अनगोळ चौथा रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या अंडरपासच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकामामुळे वाहतुकीसाठी केवळ अरुंद रस्ता उपलब्ध असून, त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून या मार्गावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून संबंधित अधिकाऱ्यांना लोकेशनसह माहिती दिली. महानगरपालिका अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केला आहे.
रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. चिखल, अंधार आणि अरुंद रस्ता यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

“तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आता नेमकी तक्रार कुणाकडे करायची?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांनी संबंधित विभागाने तातडीने स्ट्रीट लाईट सुरू करून रस्त्यावरील चिखल हटवावा तसेच अंडरपास परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.





