बेळगाव लाईव्ह : शहरात पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या विकासाबाबत महापालिकेकडून आमच्याशी कोणतीही चर्चा केली जात नाही. रस्त्यांच्या समस्यांबाबत महापालिकेचे अधिकारी किंवा पदाधिकारी आमच्याकडे येत नाहीत, अशी नाराजी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
मंगळवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, “महापालिकेकडून रस्त्यांच्या विकासाबाबत आमच्याकडे कोणीही येत नाही. चर्चा करत नाहीत, विचारतही नाहीत. आम्हाला विचारले तर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू.”
बेळगाव शहरातील महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या काळात शहरातील अनेक रस्त्यांचा विकास आपणच केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपल्या अखत्यारित नसलेल्या रस्त्यांची कामेही आपण करून घेतली आहेत.
बाची आणि जुना पी.बी. रोड यांसारख्या रस्त्यांचा विकासही आपणच केला, असा दावा सतीश जारकीहोळी यांनी केला. महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांच्या समस्या घेऊन महापालिकेचे पदाधिकारी किंवा अधिकारी आमच्याकडे कधीच आले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेकायदा पद्धतीने रस्ते खोदण्यावर महापालिकेची जबाबदारी
शहरात विविध कामांसाठी रस्ते मनमानी पद्धतीने खोदले जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, या बाबतीत जिल्हा प्रशासनाच्या हातात काहीही नाही. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
रस्ते खोदण्यासंदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची जबाबदारी महापौर आणि महापालिका आयुक्तांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध नागरी समस्यांवर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांशी समन्वय साधण्याची गरज असल्याचे या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.





