बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कळसा-भांडुरा प्रकल्प, सीमाप्रश्न तसेच संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.
समितीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कर्नाटक सरकार कळसा-भांडुरा प्रकल्पासह कुसमळी, पारिश्वाड आणि तालुक्यातील इतर भागांतील मलप्रभा नदी व तिच्या उपनद्यांवरील पाणी इतर जिल्ह्यांकडे वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे खानापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, तसेच पर्यावरण आणि जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होईल, असा दावा समितीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकल्पाला विरोध करण्याबाबत पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी, सीमाप्रश्नासंदर्भातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि संघटनेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या लवकर निकाली निघण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या एक लाख सह्यांच्या अभियानातील सह्यांची पुस्तके संबंधित कार्यकर्त्यांनी बैठकीला येताना सोबत आणावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी सर्व सदस्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.





