बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जनजीवनाला बसला असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांना मोठा फटका बसला असून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. हालात्री नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने कोणत्याही परिस्थितीत जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
वाहतूक सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी खानापूर–असोगा–मणतुर्गा–हेमाडगा किंवा खानापूर–लोंढा–रामनगर या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हालात्री नदीवरील नवीन पुलासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांतून सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, पावसाळ्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवीन पूल उभारल्यानंतर या परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांसह गोवा राज्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा अनेक वर्षांपासूनचा वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





