बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले असले, तरी त्याचा अर्थ त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असा होत नाही, असे नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथील पर्यटन निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणूक न लढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, ते सक्रिय राजकारणात कायम राहून दुर्बल आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहतील, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. आगामी निवडणुकीत ते काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारही करणार असल्याचे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून, चर्चेनंतर योग्य निर्णय घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.
नगरविकास विभागाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपण बेळगाव दौऱ्यावर आलो असल्याचे सांगत त्यांनी महापालिका आणि शहरातील विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती दिली.
बेळगाव महापालिकेसाठी मुख्यमंत्री विशेष अनुदान स्थगित झाल्याबाबत विचारले असता, याबाबत संपूर्ण माहिती नसून याची पडताळणी करून माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसतात, त्या ठिकाणीही केंद्र आणि राज्य सरकारकडून विकासासाठी निधी दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एल अँड टी कंपनीने रस्ते खोदून नागरिकांची गैरसोय केल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, तेथे संबंधित कंपनीनेच रस्त्यांची योग्य दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यासाठी विशेष विकास योजनांबाबत बोलताना, आजच्या बैठकीत जिल्ह्याच्या गरजांचा आढावा घेणार असून, आवश्यक विकासकामे निश्चित करून राज्य सरकारकडून आवश्यक निधी व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.





