बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील नविलूतीर्थ धरणातून बदामी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कालव्याद्वारे तातडीने १ टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी आज येथील सर्किट हाऊसवर बदामीच्या शेतकऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पाणी न सोडल्यास पिके जळून खाक होतील आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
पूर्वी धरणात अवघा ६ टीएमसी पाणीसाठा असतानाही बदामी तालुक्याला पाणी दिले जात होते. मात्र, आता धरणात १३ टीएमसी पाणी उपलब्ध असूनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रश्नी त्यांनी प्रादेशिक आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, जलाशयांचे संपूर्ण नियंत्रण प्रादेशिक आयुक्तांकडे असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तेच अंतिम निर्णय घेऊ शकतात.
शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण स्वतः प्रादेशिक आयुक्तांकडे तातडीने शिफारस करणार आहोत. खासदार जगदीश शेट्टर यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून पिके आणि जनावरांच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली आहे.





