बेळगाव लाईव्ह :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर बुधवारी दुपारी दीड वाजता मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करणार आहेत.
बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रकरणाच्या सुनावणीला गती देण्यासाठी कायदेशीर रणनीती, राज्य सरकारची भूमिका आणि पुढील कृती आराखड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच सीमा प्रश्नाशी संबंधित पुरावे, कागदपत्रे आणि स्थानिक माहिती अधिक प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडण्याबाबतही विचारविनिमय होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बैठकीत मराठी भाषिकांवरील कथित अन्याय, मराठी भाषा व शिक्षणाशी संबंधित अडचणी, प्रशासकीय स्तरावरील प्रश्न तसेच सीमा भागातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशीही समितीची भूमिका आहे.
उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केल्यानंतर ही पहिल्यांदाच होत असलेली महत्त्वाची बैठक मानली जात असून, सीमा प्रश्नाच्या कायदेशीर आणि राजकीय लढ्याला अधिक बळ देण्यासाठी या बैठकीतील निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.




