बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या व धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. राकसकोप्प जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच जलाशयाचे दरवाजे एक इंचाने उघडण्यात आले होते. त्यामुळे मार्कंडे नदी दुथडी भरून वाहत आहे.
मार्कंडे नदीतील वाढत्या पाण्यामुळे कंग्राळी खुर्द येथील जुना पूल यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून परिसरातील काही गावांचा संपर्कही विस्कळीत झाला आहे.
नदीची पातळी धोक्याच्या दिशेने वाढत असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेकडो एकर शेतीमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असून कोयना धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणाचा स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजाही उघडला असून कृष्णा नदी खोऱ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याचा परिणाम सीमाभागातील नदीकाठच्या गावांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पूल, बंधारे आणि पुरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





