बेळगाव लाईव्ह : सरकारी योजनांचा गैरवापर करत विविध योजनांचा अपात्र असूनही लाभ घेण्यासाठी कित्येक लोकांची धडपड सुरू असते. मात्र बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले हे अपवाद ठरले असून त्यांनी आपल्या आईच्या निधनानंतर गृहलक्ष्मी योजनेचा लाभ स्वतःहून थांबवून प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श ठेवला आहे. योजनेचा चुकीचा लाभ सरकारकडून मिळू नये यासाठी त्यांनी तत्परतेने प्रशासनाकडे मृत्यू प्रमाणपत्र सादर केले आहे.
राज्यात २०२३ मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रसाद चौगुले यांनी त्यांची आई विजया चौगुले यांच्यासाठी अर्ज केला होता.
त्यानुसार गेल्या ३ वर्षांपासून या योजनेची रक्कम विजया चौगुले यांच्या बँक खात्यात नियमितपणे जमा होत होती. दरम्यान, २६ एप्रिल रोजी विजया चौगुले यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर प्रसाद चौगुले यांनी प्रामाणिकपणा दाखवत केवळ एका महिन्याच्या आत संबंधित विभागाशी संपर्क साधला. त्यांनी प्रशासनाकडे आईचे मृत्यू प्रमाणपत्र सुपूर्द करून गृहलक्ष्मी योजनेचा लाभ त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे.
या वैयक्तिक दुःखातही प्रसाद चौगुले यांनी सामाजिक भान आणि प्रामाणिकपणा विसरला नाही. आईच्या मृत्यूनंतर तिचे पैसे खात्यावर जमा होत राहणे चुकीचे आहे, ही जाणीव ठेवून त्यांनी केवळ एका महिन्याच्या आत प्रशासनाकडे धाव घेतली.
आईचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करून गृहलक्ष्मी योजनेचा लाभ त्वरित थांबवण्याची विनंती त्यांनी केली, असून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.




