बेळगाव लाईव्ह :बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट यार्डमध्ये योग्य सोय नसल्यामुळे विक्रीसाठी आलेल्या भाजीपाल्याचे काल रात्री पडलेल्या पावसामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जय किसान होलसेल भाजी मार्केट पुन्हा पूर्ववत सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहर परिसरात काल रात्री पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असून उघड्यावर ठेवलेला भाजीपाला भिजून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मार्केटमध्ये आवक झालेला भाजीपाला ठेवण्यासाठी सुरक्षित असल्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्याकडून नुकसान भरपाईची, तसेच सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले जय किसान होलसेल भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एक शेतकरी म्हणाला की, आता पावसाला सुरुवात झाली असून एपीएमसी भाजी मार्केटमध्ये योग्य सुविधा नसल्यामुळे शेतकरी आणत असलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन पुन्हा जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू करावे. कारण त्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी उत्तम सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे ते मार्केट राष्ट्रीय महामार्ग लगत असल्यामुळे तेथे शेतकऱ्यांना आपली कृषी उत्पादने घेऊन येणे आणि व्यापाऱ्यांना ती उत्पादने खरेदी करून घेऊन जाणे सोयीचे पडते. महत्त्वाचे म्हणजे तेथे शेतकऱ्यांना दर चांगला मिळतो.
तसेच शेतकऱ्यांच्या विश्रांतीची सोय वगैरे सोयी सुविधा त्या ठिकाणी आहेत. तेंव्हा कृपया शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि कृषी उत्पादनांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने जय किसान होलसेल भाजी मार्केट पुन्हा पूर्ववत सुरु करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.





