बेळगाव लाईव्ह : खासदार जगदीश शेट्टर यांनी हुबळी येथे नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांची भेट घेऊन बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार जगदीश शेट्टर यांनी हुबळी येथे नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक पी. अनंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बेळगाव-धारवाड नवा रेल्वेमार्ग, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत बेळगावमधील रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण व रखडलेली भूसंपादनाची प्रक्रिया याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गामुळे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई, बेंगळुरू यासारख्या शहरांना जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प रखडला आहे.
धारवाड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भूसंपादनाला विरोध झाल्यामुळे प्रक्रिया लांबत गेली. मात्र, धारवाड जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची सूचना केल्यानंतर आता या कामाला गती मिळाली असून, तातडीने हे काम पूर्ण करून रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करावी, असे शेट्टर यांनी बैठकीत सांगितले.




