belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी मोहीम

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष तथा एमएलआयआरसीचे कमांडंट गिरीश उपाध्याय यांच्या सूचनेनुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचालवार यांनी प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहिमेला उच्च प्राधान्य दिले आहे. त्यानुसार परिसरात आजपासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कमांडंट गिरीश उपाध्याय, आमदार आसिफ सेठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुप्पेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कॅन्टोन्मेंट परिसरातील प्लास्टिक कचरा तातडीने साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी ६ वाजल्यापासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

रोजचे घरगुती कचरा संकलन पूर्ण केल्यानंतर एकूण ८४ सफाई कर्मचाऱ्यांना या विशेष मोहिमेवर तैनात करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान सकाळपासून नाले, गटारे, मोकळ्या जागा, रस्त्यांचे कडे आणि क्रीडांगणांमधून सुमारे १ टन कचरा हटवण्यात आला आहे, असे सुदाम मंचालवार यांनी स्पष्ट केले.

 belgaum

स्वच्छता मोहिमेदरम्यान यंदे खूट जवळील नाल्यात वैद्यकीय कचरा टाकल्याचे आढळून आले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच मोकळ्या जागेत प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला हॉटेलमधील अन्नपदार्थांचा कचराही सापडला आहे. कॅन्टोन्मेंट परिसराबाहेरील काही लोक कॅम्प भागातील चंदगड बस स्टॉपपासून गणेशपूर आणि हिंडलगा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे कचरा टाकत असल्याचे समोर आले आहे, असे सुदाम मंचालवार यांनी सांगितले.

प्लास्टिक कचरा हा जनतेचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी मोठा धोका बनला आहे. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि कचरा गटारांमध्ये टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबतो. यामुळे साचलेल्या पाण्यात डास आणि हानिकारक जीवाणूंची पैदास होते. या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, टायफॉइड यांसारखे धोकादायक आजार पसरू शकतात, ज्याचा फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो. तसेच प्लास्टिक जाळल्याने विषारी धूर हवेत पसरून श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर किंवा नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो केवळ कचरा संकलन वाहनांकडेच द्यावा, असे आवाहन सुदाम मंचालवार यांनी केले आहे.

या मोहिमेदरम्यान काही रहिवाशांनी घरासमोर लोखंडी शेड आणि इतर बांधकामे करून रस्त्यांवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या अडथळ्यांमुळे कचरावाहू गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांना गल्लीबोळात जाणे कठीण होत आहे. त्यामुळे कॅम्प परिसरातील नागरिकांनी हे अनधिकृत अडथळे त्वरित हटवून रस्ते मोकळे करावेत, अन्यथा बोर्डाकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सुदाम मंचालवार यांनी दिला आहे.

स्वच्छता होती ही केवळ बोर्डाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसर स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करत आहे. मात्र, जनसहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक रहिवासी, दुकानदार आणि हॉटेल मालकाने या मोहिमेत जबाबदार भागीदार व्हावे, असे आवाहन सुदाम मंचालवार यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.