बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कपिलेश्वर मंदिराजवळील कपिलानाथ तलावात सातत्याने होणारे अपघात आणि मृत्यूच्या घटनांची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने या परिसरात सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली आहे. या तलावाची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या ताज्या घटनेनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार येथे निषेधाज्ञा लागू करण्यात आली आहे.
कपिलेश्वर मंदिराच्या मागे असलेला कपिलानाथ तलाव अत्यंत जुना असून त्याची तटबंदी कमकुवत झाली आहे. या ठिकाणी दररोज लहान मुले आणि नागरिक पोहण्यासाठी येत असतात. ३ मे २०२६ रोजी तलावाची भिंत मुलांवर कोसळून दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या अहवालानुसार, २०१३ ते २०२६ या काळात या तलावात पडून १४ दुर्घटना घडल्या असून, एकूण १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तलाव परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पोलीस निरीक्षकांच्या अहवालाची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी हा परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. ८ मे २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत या तलावात कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
या आदेशानुसार, मंदिराचे व्यवस्थापन आणि अधिकृत कर्मचारी वगळता सर्वसामान्यांना तलाव परिसरात जाण्यास सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच तलाव परिसरात कोणत्याही प्रकारचे जलक्रीडा प्रकार आयोजित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
धार्मिक विधींसाठी कपिलेश्वर मंदिराशी संबंधित असणाऱ्या बाबींना या आदेशातून वगळण्यात आले आहे. खडेबाजार पोलिसांनी या संदर्भात तातडीने माहिती फलक लावून नागरिकांना सूचित करावे, असे निर्देश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत.




