बेळगाव लाईव्ह : दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यामध्ये परगाहून येणाऱ्या वाहनांची पडणारी भर यासह प्रमुख चौक, ठिकाणी वगळता अन्यत्र होणारे रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे अलीकडे बेळगाव शहरात विशेषतः आरपीडी रोडसारख्या वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक नियम उल्लंघनाचे प्रमाण वाढले असून ज्याचा लोकांना त्रास होत आहे. यासाठी रहदारी पोलिसांकडून शहरातील वाहतूक यंत्रणेवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गोवा (जीए) नोंदणी असलेली वाहने गोवा आणि कर्नाटक दरम्यान वारंवार प्रवास करत असतात. रहदारी पोलिसांचा धाक न राहिल्यामुळे बेळगावात येणाऱ्या गोव्याच्या काही चालकांमुळे अरुंद रस्त्यांवर चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, बेदरकार किंवा आक्रमकपणे गाडी चालवणे, शहराच्या हद्दीत हाय-बीम लाईटचा वापर करणे आणि स्थानिक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या फक्त गोवा नोंदणीकृत वाहनांपुरत्या मर्यादित नसून काही स्थानिक वाहनचालकही या समस्यांमध्ये भर घालत असतात. खरा मुद्दा केवळ नोंदणीचा नसून अंमलबजावणी आणि वाहन चालवण्याच्या वर्तनाचा आहे.
हे वारंवार घडण्यास वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक नियमांची अंमलबजावणी कमकुवत किंवा विसंगत असणे, चुकीच्या पार्किंगसाठी आणि हाय बीमसाठी कठोर दंडाचा अभाव, आरपीडी रोडसारख्या वाढत्या भागांमध्ये वाहतुकीचे प्रमाण वाढणे, स्थानिक आणि परगावचे वाहन चालक शहरातील नियम न पाळणे या गोष्टी कारणीभूत आहेत. या समस्यांच्या निवारणासाठी बेळगाव रहदारी पोलिसांकडून अधिक कठोर कारवाईची गरज आहे.
त्यासाठी चुकीच्या पार्किंगसाठी कोणताही अपवाद न ठेवता दंड किंवा वाहन टोइंग करणे, हाय-बीमच्या गैरवापराबाबत जनजागृती मोहीम राबवणे, नियमांचे उल्लंघन झाल्यास सार्वजनिक तक्रारीची (फोटो/व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर) तात्काळ दखल घेऊन कारवाई, या गोष्टींची अंमलबजावणी आवश्यक आहे.
एखाद्या रस्त्यावर जर वाहतूक कोंडी 10 मिनिटे टिकली, तर हा एक स्पष्ट संकेत आहे की वाहतूक यंत्रणेवर अधिक कडक नियंत्रणाची गरज आहे, त्यासाठी केवळ एका प्रकारच्या वाहनावर दोषारोप करणे पुरेसे नसल्याचे जागरूक नागरिकांचे मत आहे.





