बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील (जि. बेळगाव) पास्तोळी गावामध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याविना गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने सदर गावातील पाण्याच्या समस्येचे तात्काळ निवारण करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
खानापूर तालुक्यातील मेरसा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या डोंगर भागात असलेल्या पस्तोली गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील विधानसभा निवडणुकीआधी गावात 50 फूट उंचीची मोठी टाकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक घरासमोर नळ जोडणीही करण्यात आली. तसेच पाण्याची टाकी उभारण्या आली, मात्र ती 50 ऐवजी अर्धवट अवघी 10 फुटांची बांधण्यात आली आहे. याखेरीज या टाकीत डोंगराखालच्या मोठ्या टाकीतून पाणी उपसा करण्याची यंत्रणा नसल्यामुळे बांधल्यापासून ही टाकी कोरडीच आहे. परिणामी गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे.
सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याविना गावकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असून गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांना दूरवर पायपीट करावी लागत आहे.
पाणी टंचाईसंदर्भात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत इकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. पस्तोली गावकऱ्याकडून मेरसा ग्रामपंचायत सर्व प्रकारचे कर वसूल करत असते. मात्र या गावाला चांगल्या मूलभूत नागरी सुविधा विशेष करून पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे. तरी खानापूरच्या आमदारांसह प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सध्या किमान पस्तोली गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या युद्धपातळीवर सोडवावी अशी जोरदार मागणी त्रस्त हतबल गावकऱ्यांकडून केली जात आहे.

आपल्या गावातील पाण्याच्या समस्येची माहिती देताना पस्तोलीचे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ईश्वर गावडे यांनी आमच्या गावात सुमारे 6 वर्षांपूर्वी 50 फूट उंचीची पाणीटाकी मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्षात फक्त अंदाजे 10 फूट बांधकाम करून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून काम पूर्ण झालेले नाही.
यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही, असे सांगून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पस्तोलीतील पाण्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी गावडे यांनी केली.




