belgaum

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रनिर्माणासाठी मार्गदर्शक : प्रा. राजीव भार्गव

0
383
 belgaum

बेळगाव लाईव्ह : देशाच्या सार्वजनिक जीवनाला आकार देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि नैतिक तत्त्वे अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. आंबेडकरांनी आपल्या सुस्पष्ट विचारांच्या जोरावर शिक्षण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि जातिभेदासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत जबाबदारीने कार्य केले, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. राजीव भार्गव यांनी व्यक्त केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर अभ्यास केंद्र आणि समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विवेक, तर्कसंगतता आणि प्रजासत्ताक: डॉ. बी. आर. आंबेडकर’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा सोहळा पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही बदल्याची भावना ठेवली नाही, तर त्यांनी आयुष्यभर केवळ न्यायाचा शोध घेतला. जातिव्यवस्थेतील भेदभाव हा अपघाती नसून तो जाणीवपूर्वक रचलेली एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आणि समाजाचे शाश्वत हित जपण्यासाठी नैतिक तत्त्वांची जोड असलेले नियम आवश्यक असल्याचे आंबेडकरांचे मानणे होते, असे प्रा. राजीव भार्गव यांनी बीजभाषणात स्पष्ट केले.

 belgaum

आजच्या तरुण पिढीने कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा न देता ज्ञानाची उपासना करावी आणि आपली नैतिक क्षितिजे विस्तारण्यासाठी प्रयत्न करावेत. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या या सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत प्रभावीपणे कार्य करणे आवश्यक असल्याचा सल्ला प्रा. राजीव भार्गव यांनी दिला.

उत्तर कर्नाटकातील विद्यापीठांना सरकारने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या योजना तयार कराव्यात. समाजकल्याण विभागाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र या दिशेने सक्रियपणे प्रयत्न करत असल्याची माहिती डॉ. साबिर अहमद मुल्ला यांनी दिली.

आजच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित न करता कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता तत्त्वज्ञान आणि ज्ञानाच्या माध्यमातून अंतर्यामी प्रवास करावा. डॉ. आंबेडकरांचे विचार हा अंतर्प्रवास आणि चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे मत कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराजा यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.

या कार्यक्रमाला म्हैसूर विद्यापीठाच्या आंबेडकर केंद्राचे डॉ. जे. सोमशेखर, कुलसचिव संतोष कामगौडा, परीक्षा नियंत्रक प्रा. डी. एन. पाटील, वित्त अधिकारी एम. ए. सपना, डॉ. अशोक डिसोझा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गजानन नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. अश्विनी एम. जमुनी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.