Home बातम्या मठात रात्री अनैतिक प्रकाराची शंका; अडवीसिद्दराम स्वामींची हकालपट्टी
belgaum

मठात रात्री अनैतिक प्रकाराची शंका; अडवीसिद्दराम स्वामींची हकालपट्टी

0
मठात रात्री अनैतिक प्रकाराची शंका; अडवीसिद्दराम स्वामींची हकालपट्टी
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावातील अडवीसिद्धेश्वर मठात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मठाचे स्वामीजी अडवीसिद्धराम स्वामी हे एका महिलेसोबत असताना गावकर्‍यांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वामीजींवर हल्ला चढवला आणि त्यांना मध्यरात्रीच मठातून बाहेर काढले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारात काही तरुणांनी महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करत केल्याचाही आरोप समोर आला आहे.

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बागलकोट जिल्ह्यातील तालिकोट येथून एक महिला आपल्या मुलीसोबत शनिवारी (२१ जून २०२५) सायंकाळी अडवीसिद्धेश्वर मठात आली होती आणि रात्री ती तिथेच थांबली. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काही स्थानिकांनी स्वामीजी, ती महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत असल्याचे पाहिले.

ही बाब समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मठात जमा झाले. संतप्त जमावाने मठात घुसून स्वामीजी अडवीसिद्धराम स्वामी यांना धारेवर धरले आणि त्यांच्यावर हल्लाही केला. त्यांना मारहाण करण्यात आली आणि कपाळमोक्षही करण्यात आला. याच वेळी काही तरुणांनी महिलेसोबत असभ्य वर्तन केले, तर तिच्या अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिला ओढले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी महिला आणि तिच्या मुलीला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढून समुपदेशन केंद्रात पाठवले. त्यानंतर, गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून रात्रीच स्वामीजी अडवीसिद्धराम यांना मठातून बाहेर काढले. सध्या स्वामीजी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे असल्याचे समजते.

या घटनेला काही दिवसांपूर्वीच रायबाग तालुक्यात घडलेल्या एका अशाच घटनेची किनार आहे. रायबाग तालुक्यातील मेकळी गावात राम मंदिराचा मठ उभारून राहणाऱ्या हठयोगी लोकेश्वर स्वामीजी यांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता.

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या स्वामीजींना अटक केली होती. ही मुलगी आपल्या मामाच्या घरी जात असताना, स्वामीजींनी तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले आणि रायचूर येथील एका लॉजमध्ये दोन दिवस ठेवून अत्याचार केले होते. त्यानंतर बागलकोटला आणूनही तिच्यावर अत्याचार करून धमकावून महालिंगपूर बसस्थानकात सोडून दिले होते. या घटनेनेही संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

अशा या घटनेमुळे धार्मिक संस्थांच्या पावित्र्यावर आणि तेथील कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात धार्मिक नेत्यांवर होणारे असे आरोप समाजासाठी चिंतेचा विषय बनले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.