Thursday, May 16, 2024

/

मराठा योध्याची तोफ सीमाभागात धडाडणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ देणारे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ३० एप्रिल रोजी बेळगावमध्ये येणार आहेत. धर्मवीर संभाजी उद्यानात भव्य सभेच्या माध्यमातून मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजवत खुद्द पंतप्रधानांना देखील याची दखल घेण्यासाठी भर पडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तोफ बेळगावमध्ये धडाडणार आहे. बेळगावमधील मराठी भाषिकांवरील सध्या ओढवलेली स्थिती पाहता मनोज जरांगे पाटील यांचे मार्गदर्शन हे लाखमोलाचे नक्कीच ठरणार आहे.

मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरु असूनही सरकारने अधिक जागृत होऊन समाजाला न्याय द्यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आपल्या नेतृत्वाखाली एकवटण्याची ताकद असणारे मनोज जरांगे पाटील बेळगावमधील मराठा भाषिकांना एकत्र करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. सीमाभागात ३.५ लाख इतके मराठा समाजाचे नागरिक आहेत.

मात्र तरीही कर्नाटकाकडून समाजाची केली जाणारी हेळसांड, मराठी भाषिकांचे होणारे अतोनात नुकसान आणि योग्य नेतृत्वाअभावी मराठी भाषिकांची होणारी फरफट या साऱ्या परिस्थितीवर अंकुश मिळविण्यासाठी तसेच सीमाभागातील समस्या राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या बेळगावमध्ये होणाऱ्या सभेत प्रयत्न करणार आहेत.

 belgaum

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी त्यांनी स्वत:च्या मालकीची जमीन विकून चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषण केले. सीमाभागातील मराठी भाषिकांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. गेल्या ६७ वर्षांपासून मराठीसाठी तळमळीने कार्य करणाऱ्या मराठी भाषिकांनी आजवर तनमनधनाने लढ्यात सहभाग दर्शविला.Manoj

प्रसंगी लाठ्या – काठ्या झेलल्या. कारागृहाची शिक्षा भोगली, अनेक तरुणांचे भवितव्य उद्धस्त झाले. मराठी माणसाची हक्काची संघटना असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीला खिंडार पडल्याने काही मराठी भाषिक सध्या निद्रिस्त झाले आहेत. मात्र सीमाभागात सध्या मराठीविरोधी सुरू असलेली मोहीम लक्षात घेता मराठी समाजाला एकत्र करून लढा देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण मराठा समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर एकजुटीने तुटून पडून प्रत्युत्तर द्यावे, यासाठीच मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषेवरील अतिक्रमण, कन्नड सक्ती, मराठी माणसाला न मिळणारी किंमत, शासकीय कार्यालयात मराठी भाषेला देण्यात येणार दुय्यम दर्जा, मराठीविरोधी भूमिका घेत भूमिपुत्रांना नेस्तनाबूत करण्याचा प्रशासनाचा डाव, नामफलकांवरील कन्नड सक्ती आणि विधानसभेत मंजूर झालेला कन्नड सक्ती विधेयक कायदा या साऱ्या गोष्टी मराठी भाषिकांवर घटनेच्या विरोधात जाऊन बेकायदेशीरपणे लादण्यात येत आहेत. या विरोधात सर्व मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन, एकजुटीने याचा विरोध करून आपला मराठी बाणा आणि मराठी कणा दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने एकत्र यायचं आहे.

धर्मवीर संभाजी उद्यानात हि सभा आयोजिण्यात आली असून महाराष्ट्रातील दौरे उरकून बेळगावमध्ये केवळ मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी येत असलेल्या जरांगे पाटील यांच्या सभेला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा एकदा मराठीचा एल्गार पुकारणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.