बेळगाव लाईव्ह :कोण कोणत्या पक्षात जातोय, कोणत्या पक्षातून येतोय त्यापेक्षा आमच्यासाठी आमचा उमेदवार विजयी होणे महत्त्वाचे असून ते आमचे सध्या एकमेव ध्येय आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
शहरातील गांधी भवन येथे आज मंगळवारी बेळगाव जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने बेळगाव लोकसभा निवडणुकी संदर्भात बेळगाव उत्तर मधील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर मंत्री जारकीहोळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना सन्मान दिला. आता पुन्हा भाजपमध्ये जाणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आता बेळगाव मधून भाजपचे तिकीट मिळालेल्या जगदीश शेट्टर यांच्याबद्दल अधिक चर्चा करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. सध्या आमच्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे एवढेच आमचे एकमेव ध्येय असणार आहे.
चिक्कोडीतील शंभू कल्लोळकर यांची सभा आणि माजी आमदार रमेश कुडची यांनी केलेला आरोप याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री जारकीहोळी यांनी शंभू कल्लोळकर हे बंडखोर उमेदवार नाहीत. तसेच त्यांनी सभा घेतल्याबद्दलची मला माहित नाही.
काँग्रेस पक्षाचा आणि शंभू कल्लोळकर यांचा काही संबंध नाही. अद्याप विधानसभा निवडणुकीला सहा महिने असताना त्यांनी येऊन तिकिटाची विचारणा केली होती, जे त्यांना मिळाले नाही, असे सांगितले.
आता पुढील वेळेस रायबाग मतदार संघातीलच कार्यकर्त्याला पक्षाचे तिकीट मिळेल. पुढील निवडणुकीला चार वर्षे असताना हे मी आत्ताच सांगत आहे, असेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.