बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील लिंगनमठ परिसरात आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मृत तरुणाची आई असल्याचा दावा एका महिलेने केला होता. मात्र मृत तरुणाची आई असल्याचा संबंधित महिलेचा दावा खोटा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
आज याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सदर माहिती दिली. मृत बसवराज हे गेल्या १४ वर्षांपासून शांतव्वासोबत होते. हे दोघे मजुरीच्या कामासाठी गोवा, बेंगळूर अशा अनेक ठिकाणी जात असत. बसवराजने आत्महत्या केल्यानंतर आपण त्याची आई असल्याचा दावा शांतव्वाने केला होता. मात्र खऱ्या पालकांना बोलावून विचारपूस केल्यावर तिचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
३१ जानेवारी रोजी नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगनमठ परिसरात एका अज्ञात युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहासोबत एक मोबाईलही सापडला होता. यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या प्राथमिक तपासात काही गोष्टी उघडकीस आल्या होत्या.
एका महिलेने या मोबाईल क्रमांकावर दुसऱ्या मोबाईलवरून फोन केल्याचे पुढे आले. याचा शोध घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी अळणावर येथे जाऊन तपासणी केली असता एक ५८ वर्षीय महिला आढळून आली. या महिलेची विचारपूस केली असता सदर महिलेचे नाव शांतव्वा असून आपण मृत बसवराजची आई असल्याचे तिने सांगितले. मृत तरुण व महिला हे दोघे मायलेक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत तरुणाच्या खऱ्या आई-वडीलांना बोलावून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शांताव्वा ही महिला ट्रेनमधून प्रवास करत असताना मद्यधुंद अवस्थेत दिसून आली होती. यावेळी सोबत असणाऱ्या इतर प्रवाशांसोबत वादावादी झाल्याचेही पोलीस तपासात पुढे आले असून ही घटना अळणावरपासून ७ किमी अंतरावर घडली आहे. याप्रकरणी अद्याप तपस पूर्ण झाला नसून जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.