Sunday, October 6, 2024

/

संतप्त खादरवाडी ग्रामस्थांचा पिरनवाडी पट्टणपंचायतीवर मोर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:खादरवाडी गावातील पिण्याचे पाणी, खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी आदी नागरी समस्या दूर कराव्यात या मागणीसह अन्यायी घरपट्टी, कॉम्प्युटर उताऱ्याच्या नावाने केली जाणारी लूट, याच्या विरोधात खादरवाडी ग्रामस्थांनी आज मंगळवारी सकाळी पिरनवाडी पट्टण पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन सादर केले. तसेच मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, वाढीव घरपट्टी वगैरे विविध समस्यांनीग्रस्त झालेल्या संतप्त खादरवाडी ग्रामस्थांनी आज राकेश पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली पिरनवाडी पट्टण पंचायतीवर भव्य मोर्चा काढला. त्यानंतर पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हनमंतय्या यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाचा स्वीकार करून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर खादरवाडी गावातील नागरी समस्या दूर करण्याचे तसेच चौकशी करून अन्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असून खराब रस्ते, पथदिपांचा अभाव, तुंबलेल्या गटारी वगैरे गावकरी हैराण झाले आहेत. तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी. त्याचप्रमाणे वाढीव घरपट्टी वसूल केले जात असून ती योग्य प्रमाणात घ्यावी. याखेरीज घराचे कॉम्प्युटर उतारे बनविण्यासाठी अवाढव्य रकमेची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी त्याची चौकशी करून योग्य ती रक्कम आकारले जावी. मनमानी रक्कम मागितली जात असल्यामुळे गावातील गरीब जनतेला त्रास होत आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन समस्यांचे निवारण करण्याद्वारे आम्हाला योग्य न्याय द्याल ही अपेक्षा आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.Khadarwadi protest

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना युवा नेते राकेश पाटील निवेदन सादर करण्याचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की, आज आमच्या गावाला गेल्या 8 वर्षांपासून कोणीही पंच अथवा सक्षम अधिकारी नाही. निवडणुका नाहीत. परिणामी आपली व्यथा मांडण्यासाठी संपूर्ण गावाला या ठिकाणी यावे लागत आहे. याची ग्रामपंचायतीसह पट्टणपंचायतीने तसेच जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. आज आमच्या गावातील रस्ते खराब झाले आहेत. पथदीप एकही सुरू नाही. गटारी तुंबल्या आहेत, अशा असंख्य समस्या आहेत. या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. त्याचप्रमाणे पट्टणपंचायतीच्या सीईओंनी स्वतः जातीने आमच्या गावाला भेट देऊन आमच्या समस्या जाणून घ्याव्यात. सध्या घरपट्टी देखील जुन्या घरपट्टीच्या तुलनेत तिप्पटीने वाढविण्यात आली आहे. ही वाढ रद्द करून घरपट्टी पूर्वी ग्रामपंचायतीकडून आकारल्या जाणाऱ्या घरपट्टी प्रमाणे आकारली जावी. त्याचप्रमाणे घरचा कॉम्प्युटर उतारा असेल तरच घरपट्टी भरून घेतली जाईल असे सांगितले जात आहे. तसेच कॉम्प्युटर उतारा काढून देण्यासाठी 30 हजार, 40 हजार, 50 हजार रुपये अशा अवाढव्य रकमेची मागणी केली जात आहे.

या पद्धतीने आडकाठी करून मनमानी कारभाराद्वारे पट्टणपंचायतीत जनतेची लुटालुट केली जात आहे. हा गैरप्रकार तात्काळ थांबला पाहिजे. यासाठी आज आम्ही इथे मोर्चाने आलो आहोत. आमच्या मागण्यांची दखल घेऊन सीईओंनी योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडून रास्ता रोको करू. याव्यतिरिक्त आमच्या गावची जमीन गेली आहे. ती अद्याप गावाच्या नावावर झालेले नाही. ती तात्काळ नावावर केली जावी अशी मागणी करून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. जर शेतकरी रस्त्यावर उतरले सर्वांची तारांबळ उडेल. त्यावेळी आम्ही आमची कुटुंब, जनावरे सर्वांसह रस्त्यावर उतरू हे प्रशासनाने लक्षात ठेवावे, असे राकेश पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.