Wednesday, May 8, 2024

/

अयोध्यापती प्रभू रामचंद्राच्या बेळगावमधील पाऊलखुणा….

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : येत्या २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाचा भव्य आणि दैदिप्यमान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता संपूर्ण देशवासियांना लागली असून अयोध्येत होणाऱ्या मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभर रामनामाचा जागर सुरु आहे. हा सोहळा इतिहासात नोंद करण्याचा ध्यास भारतवासीयांनी घेतला असून याच पार्श्वभूमीवर ‘बेळगाव लाईव्ह’ ने प्रभू श्रीरामचंद्राच्या बेळगावच्या पाऊलखुणा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीराम भक्तीचे सर्वोच्च उदाहरण म्हणून शबरीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पितृआज्ञा पाळण्यासाठी वनवासात गेलेल्या श्रीरामचंद्रांच्या प्रवासात, आतुरतेने वाट पाहणाऱ्या शबरीची आणि शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा आबालवृद्धांना ज्ञात आहे. परंतु रामायणातील या महत्वपूर्ण शबरीमातेचा इतिहास बेळगावशी खूप जवळून जोडला गेल्याच्या पाऊलखुणा उपलब्ध आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान या गावाशी माता शबरीचे नाते अगदी जवळचे आहे. रामायणात प्रभू श्री रामचंद्रांच्या वनवासातील प्रवासात आतुरतेने वाट पाहणाऱ्या शबरीच्या आश्रमाचे ठिकाण म्हणजेच सुरेबान. येथील रामायणातील पाऊलखुणा रामायणातील श्रीराम आणि शबरी भेटीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत.

 belgaum

रामायणात ज्या जंगलात शबरी राहात होती ते ठिकाण म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान हे गाव अशी मान्यता आहे. हि बाब अलीकडेच रामायण मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अरुण गोविल यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.Rama shabari

रामदुर्ग तालुक्यातील सुरेबानचे औपचारिक नाव “शबरी व्हान” असे असून सुरेबान नजीक शबरीचे मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे या मंदिराचा परिसर “शबरी कोला” म्हणून सुप्रसिद्ध आहे. याठिकाणी आजही शबरी श्रीरामाची प्रतीक्षा करत असल्याचा लोकांचा विश्वास आहे. रामायणात कबंध राक्षसाचा जो वध झाला ते कबंध आश्रम देखील बेळगांवातच आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गनजीक करडीगुडी येथे हा कबंध आश्रम होता असे मानले जाते.

श्रीराम आणि लक्ष्मण या उभयतांनी याच ठिकाणी कबंध राक्षसाचा वध केला. कबंध राक्षस ठार झाल्यानंतर त्याचे रूपांतर गंधर्वामध्ये झाले. या गंधर्वाने स्वर्गाकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रीरामाला शबरीच्या आश्रमाला भेट देण्यास सांगितले होते. त्यानंतर “शबरीची बोरं” ही आपल्याला ज्ञात असलेली कथा घडली.

Sureban shabri aashram
Sureban ramdurg belgaum district.. जिथे रामायण काळात शबरी आश्रम होता

दरम्यान, यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना रामानंद सागर यांच्या “रामायण” या गाजलेल्या मालिकेतील श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी रामायणातील पंचवटी, निशिगंध पर्वत, शबरी आश्रम ही ठिकाणे आज देखील अस्तित्वात असल्याचे सांगितले. या ठिकाणांपैकी शबरीचे वास्तव्य असलेले ठिकाण आणि निशिगंध पर्वत कर्नाटकात असल्याचे सांगताना त्यांनी बेळगावचा आवर्जून उल्लेख केला.

सध्याच्या बेळगावनजीक एके ठिकाणी शबरीचे वास्तव्य होते. सध्या तेथे राहणारे लोक अत्यंत नशीबवान आहेत, की जे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत राहत आहेत. याठिकाणी श्रीरामांनी शबरीसह अनेकांचा उद्धार केला आहे असेही अभिनेते अरुण गोविल यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.