Thursday, May 9, 2024

/

प्रामाणिकपणा योग्य दिशा म्हणजेच जरांगे पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह विश्लेषण :मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील हे जेंव्हा जालना येथील आपल्या गावी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणास बसले होते त्यावेळी छ्त्रपती संभाजी नगर येथे बेळगाव लाईव्हच्या टीमने आम्ही त्यांची भेट घेऊन एकंदर आंदोलन आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा याबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यावेळी बोलताना जरांगे -पाटील यांच्या प्रत्येक शब्दात आणि त्यांच्या एकंदर वागणुकीत ‘हे आरक्षण मी मिळवणारच’ असा आत्मविश्वास दिसत होता.

सकल मराठा समाज मनोज जरांगे -पाटील यांच्या पाठीशी का उभा राहिला? याचे संशोधन बेळगाव लाईव्ह टीमने केले. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जरांगे -पाटील यांचा प्रामाणिकपणा!
त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसून येत होता. प्रत्येक बाबीत ते जसे आग्रही होते तसे प्रामाणिकही होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे द्योतक म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की करोडो लोक घेऊन मी मुंबईत येईन आणि सांगितलेले करून दाखवताना करोडो लोक घेऊन ते मुंबईच्या वेशीवर गेले. त्यावेळी सरकारला हे कळून चुकलं की हा माणूस प्रामाणिक आहे आणि म्हणेल ते करून दाखवण्याची क्षमता बाळगणारा आहे. हे लक्षात येताच सरकारला झुकून खाली यावं लागलं आणि वाशीत जेथे मनोज जरांगे पाटील थांबले होते तिथे येऊन सरकारला त्यांच्या म्हणण्यानुसार मागणी मान्य करावी लागली.

मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी आपल्या आंदोलनाला फाटे फुटू दिले नाहीत किंवा लोकांमध्ये मतमतांतर होऊ दिले नाही. ‘मराठा आरक्षणाचे आंदोलन’ हा एकच विषय घेऊन ते पुढे जात राहिले. आपल्या विषयाशी आपल्या मताशी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणारी माणसे कशा पद्धतीने काम करू शकतात याचे उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील हे होत.

 belgaum

त्याचबरोबर मनोज जरांगे -पाटील यांनी आपल्याबरोबर आलेल्या लोकांना व्यवस्थित आणणं आणि व्यवस्थित पाठवणं याची जबाबदारी घेतली. एखादा कुटुंबप्रमुख आपले स्वतःचे ध्येय साध्य करत असताना आपल्या कुटुंबातील प्रत्येक घटकाचा जसा विचार करत असतो. त्या पद्धतीचा विचार जरांगे -पाटील यांचा असल्यामुळे संपूर्ण समाजाचा मनोज जरांगे -पाटील यांच्यावर गाढ विश्वास बसला. हे सर्व होत असताना सरकार वेगळ्या भूमिकेत जाऊन जरांगे -पाटील यांचे आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नात होते.Manoj jarange

तथापि सरकारच्या प्रयत्नांना यश आले नाही. कारण प्रत्येक वेळी जनशक्तीचा रेटा आणि जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा सरस ठरत गेला. अखेर काल शुक्रवारी मध्यरात्री मनोज जरांगे -पाटील यांच्या भेटीला सरकारच्या प्रतिनिधींना यावे लागले. कारण जरांगे -पाटील हे जर मुंबईच्या आझाद मैदानावर गेले असते तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत एकवटला असता तर त्याचे नियोजन करणे, त्याला समजावणे सरकारला कदापी शक्य झाले नसते.

मराठा समाजाच्या या आंदोलनाला जे यश आलं ते सरकारची मेहरबानी नसून ती त्यांची न्याय मागणी आहे. तसेच जरांगे -पाटील यांनी आपली मागणी कशी न्याय्य आहे हे जनतेच्या दरबारात आणि सरकारच्या दरबारात दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने मांडून दाखवत आपले आंदोलन यशस्वी केले. बेळगाव लाईव्ह या संपूर्ण यशाकडे एकाच वाक्यात बघते ते म्हणजे ‘प्रामाणिकपणा आणि सुनिश्चित ध्येय असेल तर यश हातात पुष्पमाला घेऊन तुमची प्रतीक्षा करत असते’.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.