Monday, April 29, 2024

/

राज्याचा जी डी पी वाढला : सिद्धरामय्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या पाच हमी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब, महिला, मजूर आणि मागासवर्गीय कुटुंबातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिक घडामोडी सुरू होतील. यामुळे राज्याचा जीडीपी वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

अथणी तालुक्यातील कोकटनूर येथे शुक्रवारी (11) पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

शक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 35 कोटी महिलांनी बसमधून मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होईल. गृहलक्ष्मी योजना ही देशातील एक दुर्मिळ योजना आहे. जी राज्यातील 1.30 कोटींहून अधिक कुटुंबांना दरमहा 2,000 रुपये देते. त्यासाठी दरवर्षी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे सिद्धरामय्या म्हणाले.

 belgaum

हमी योजनांच्या अंमलबजावणीसह सरकारच्या कामगिरीने विरोधकांना धक्का बसला आहे. सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
गेल्या वेळी 165 आश्वासनांपैकी 158 पूर्ण करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या 76 आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात पावले उचलण्यात आली आहेत.

पाचपैकी तीन हमी योजना पूर्ण झाल्या आहेत. गृहलक्ष्मी या महिन्यात राबविण्यात येत आहे, तर पाचवी हमी युवा निधी योजना डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात पशुधनाचे प्रमाण जास्त असून पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे पशुधनाच्या आरोग्य सेवेसह कृषी विकासाला पूरक ठरणार आहे. अथणी मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण सवदी यांचे योगदान मोठे आहे. आपापल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे. याबाबत सवदींची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसह सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

Sidharamayya
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी अथणी आणि कागवाड मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे या भागातील शेतकरी, विद्यार्थी व पशुपालकांना आगामी काळात फायदा होणार आहे. महाविद्यालयाला आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. अथणी परिसरातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन अधिक निधी देणार आहे.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्राकडून 4 टीएमसी पाणी घ्यावे. पाणी विनिमय करारासाठी शासनाने पुढे यावे, असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
या परिसरात पशुवैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी आणि गुरे पाळणार्‍या शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरेल, असे पशुसंवर्धन व रेशीम शेती मंत्री के. वेंकटेश यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी 20 कोटींचा निधी तातडीने द्यावा. अथणी भागातील सुकी द्राक्षे शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून खरेदी करून पौष्टिक आहार तयार करून शेतकर्‍यांची सोय करावी, अशी विनंती आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली.

अथनीमध्ये बसवेश्वराच्या पुतळ्याचे अनावरण
तत्पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते अथनी येथील बसवेश्वर सर्कल येथे बसवेश्वरांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. लघु पाटबंधारे मंत्री एन. एस. भोसराजू, परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी, अशोक पट्टन, आमदार विश्वास वैद्य, जे. टी. पाटील, महेंद्र तम्मनवर, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्ीहोळी, कोकटनूर ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती पुजारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वागत केले. बीदर येथील पशू व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.सी. वीरण्णा यांनी त्यांचा सत्कार केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.