Wednesday, June 18, 2025

/

महिलावर्गाने बस फुल्ल! इतरांची मात्र बत्ती गुल!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जाहीर केलेल्या पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या महिलांसाठीच्या मोफत बसप्रवासाच्या शक्ती योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर हि योजना संपूर्ण राज्यात धुमधडाक्यात सुरु आहे. योजनेला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात महिलांनी मोफत बससेवेचा पुरेपूर लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अपुऱ्या बस, महिलावर्गाची होत असलेली तुडुंब गर्दी यामुळे इतर प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

सर्व बसेस महिलांनीच तुडुंब भरल्यामुळे सर्वसामान्य पुरुष प्रवाशांना त्रास मनस्ताप सहन करावा लागत आहे. चिंतेची बाब म्हणजे बसमध्ये जागा न मिळाल्यामुळे खाजगी वाहनाने दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोफत बस प्रवासाची कर्नाटक सरकारची शक्ती योजना महिलावर्गासाठी सोयीची ठरत असली तरी इतर प्रवाशांसाठी विशेषतः शाळा – महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता ती त्रासदायक ठरत आहे. परिवहन मंडळाच्या बसेस महिलांनी तुडुंब भरत असल्यामुळे शाळा कॉलेजला ये -जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. याची प्रचिती आज सोमवारी येळ्ळूर मार्गावर आली. बसमध्ये जागा नसल्यामुळे या ठिकाणी देसुर, राजहंस गड, नंदीहळ्ळी गावचे विद्यार्थी चक्क टिप्परमधून जाताना पहावयास मिळाला. या पद्धतीने या पद्धतीने खाजगी वाहनांमधून दाटीवाटीने करावा लागणारा प्रवास विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो.School tractor

बेळगाव शहरासह आसपासच्या परिसरात अलीकडे रहदारीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेत रहदारी विभागाने तसेच प्रशासनाने काही नियमही घालून दिले आहेत. अशातच राज्य सरकारने मोफत बसप्रवासाची योजना लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलावर्ग बसमधून प्रवास करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

मात्र हि योजना महिलावर्ग वगळता इतरांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे सरकारने शक्ती योजनेचा पुनर्विचार करून सर्वसामान्य इतर प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या योजनेच्या नियमात आवश्यक बदल करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.