Thursday, April 18, 2024

/

माता-भगिनींनी ठरविले तर समितीचा विजय निश्चित :रोहित पाटील

 belgaum

मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावरची लढाई तर येत्या काळात आपल्याला लढायचीच आहे मात्र आपला आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे यासाठी ॲड. अमर येळ्ळूरकर यांना विधानसभेत बसवणे अत्यावश्यक आहे. तुमच्यासारख्या माता भगिनींनी ठरविले तर म. ए. समितीचा विजय निश्चित आहे. तेंव्हा ‘घागर’ या चिन्हा समोरील बटन दाबून ॲड. अमर येळ्ळूरकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रोहित पाटील यांनी केले.

शहरातील लोकमान्य रंगमंदिर येथे काल सोमवारी सायंकाळी आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, प्रमुख पाहुण्या माधुरी गुरव, माजी महापौर सरिता पाटील, माजी महापौर संज्योत बांदेकर, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, वैशाली हुलजी, मीनाक्षी चिगरे, किशोरी कुरणे, माया कडोलकर आदी उपस्थित होते.

युवा नेते रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात प्रारंभीच राजकीय कार्यक्रमांना महिलांची विशेष उपस्थिती नसते अशी परिस्थिती आम्ही अनेकदा पाहिली आहे. मात्र या ठिकाणची महिलांची प्रचंड उपस्थिती अपूर्व उत्साह पाहिल्यानंतर अमर दादा यांचा विजय काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे हे लक्षात ठेवा, असे स्पष्ट केले राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला.Rohit p

 belgaum

अन्यायाविरुद्ध महिलांनी कसे लढावे हे अहिल्याबाई यांनी शिकवले आहे आणि प्रसंग आला तर आपल्या मुलाला कसे घडविले पाहिजे हे राजमाता जिजाऊ यांनी शिकविले आहे. माझी उपस्थित माता-भगिनींना एकच विनंती आहे की त्यांनी जिजाऊच्या या लेकराला (ॲड. येळ्ळूरकर) निवडून आणायचे आहे आणि त्याला कर्नाटकच्या विधानसभेत बसविण्याची जबाबदारी घ्यायची आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावरची लढाई यापुढेही आपल्याला लढायचे आहे. मात्र आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲड. अमर दादा यांना विधानसभेत बसविणे आवश्यक आहे. हे ध्यानात घेतले पाहिजे असे सांगून एखाद्या महिलेने एखादे काम हातात घेतले तर ती काय करू शकते याचे उदाहरण आमदार रोहित पाटील यांनी आपल्या आईबद्दल माहिती दिली. तसेच उपस्थित माता भगिनींनी ठरविल्यास ॲड. येळ्ळूरकर यांचा विजय निश्चित आहे, असे सांगितले.

सीमाप्रश्नाचा लढा जो महाराष्ट्र एकीकरण समितीने धगधगचा ठेवला आहे, तो मोडून काढणारे सरकार कर्नाटक महाराष्ट्रातच नाही तर देशात जन्माला आलेले नाही हे मी अभिमानाने सांगतो. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बळ वाढवण्यासाठी समितीच्या हातात हात देत घागर या चिन्हा समोरील बटन दाबावे आणि ॲड. येळ्ळूरकर यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन रोहित पाटील यांनी शेवटी केले.

उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी आपल्या भाषणात निवडणूक लढविण्याचा उद्देश स्पष्ट केला. आज कर्नाटक सरकार आमचे अधिकार हिरावून घेत आहे. आमची भाषा संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे ते लक्षात घेता त्याच्या विरोधात निवडणूक लढविणे आणि आमचे उमेदवार निवडून येणे काळाची गरज आहे असे सांगून म. ए. महिला आघाडीच्या माध्यमातून येथे प्रचंड संख्येने जमलेल्या माता-भगिनी पाहता मला विश्वास आहे की पाचही मतदार संघातील आमचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. मात्र यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे संघटित ताकद दाखवली पाहिजे, असे ॲड. येळ्ळूरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.