Tuesday, April 16, 2024

/

बेरजेच्या गणितातील पराभवाची कारणमीमांसा शोधण्याची गरज!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या वर्ष- दीड वर्षात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अत्याचाराला पूर्णविराम देण्यासाठी पेटून उठलेल्या मराठी समाजाने महाराष्ट्र एकीकरण समितीकडे परतीची पाऊले उचलली. संघटना बळकटीकरणासाठी साऱ्यांनीच प्रयत्न केले. मात्र आपल्याच माणसांच्या पाठीशी उभं राहून खंबीर पाठिंबा देणाऱ्यांनीच ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. यानंतर समितीला पत्कराव्या लागलेल्या पराभवाची चर्चा सुरु झाली असून हा पराभव म्हणायचा की संधी म्हणायची याची कारण मीमांसा आणि एकंदर विचार मंथन करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबली आहे. नवीन लोक महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आकृष्ट होत आहेत. कांही ठिकाणी नवीन मतदार वाढले आहेत. मतांचा टक्का वाढलेला आहे. कांही ठिकाणी विजीगीषु वृत्तीची कमतरता असल्यामुळे तेथे पराभव झाला आहे. मात्र कांही ठिकाणी मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला कांहीसे बरे दिवस आले असेच म्हणता येईल.

विशेषतः बेळगाव दक्षिण मतदार संघात आजवर नव्हते इतके जास्त मतदान झाले. मतदानाचा जवळपास ६५००० इतका टप्पा महाराष्ट्र एकीकरण समितीने या विधानसभा निवडणुकीत मिळवल्यामुळे ही समितीसाठी मोठी जमेची बाजू म्हणता येईल. हे जे यश मिळाले आहे त्याचे विजयात रूपांतर करणे आणि समितीकडे वळलेल्या लोकांना समिती स्थिर, खंबीर आहे अशा पद्धतीचे एक नवीन कार्य हाती घेण्याच्या दृष्टीने समितीने विचार मंथन करणे गरजेचे आहे.

 belgaum

या निवडणुकीत पराभव झाला असे म्हणणे फार धाडसाचे होईल लक्षणीय पराभव झाला असला तरी नैतिकदृष्ट्या हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजयच म्हणावा लागेल. कारण बहुतांश मराठी माणसाने पुन्हा आपला मोर्चा समितीकडे वळवला आहे.

मराठी माणूस एकजूट, एकसंध होत असताना आपण आपला पराभव झाला असं मानणं हे चुकीचं ठरणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी लढविलेल्या निवडणुकीमध्ये कांही गोष्टी प्रकर्षाने महत्त्वाच्या मानाव्या लागतील. त्यापैकी एक म्हणजे समितीने काढलेल्या पदयात्रा मोठ्या प्रमाणात लोकसहभागाने फुललेल्या होत्या. त्यामुळे मराठी माणूस पुन्हा एकदा समितीकडे आकृष्ट झाला आहे असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक बुथमधून समितीला लक्षणीय मतदान झाले आहे. याचा अर्थ घराघरात बहुसंख्येने मराठी माणूस जागृत होऊन समितीकडे वळू लागला आहे.

या सर्व गोष्टींना ध्यानात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला योग्य प्रकारे रीतसर बुथनिहाय बांधणी करावी लागेल. संघटनेचे टप्प्याटप्प्याने स्तरास्तरावर पद वाटप करून रचना करावी लागेल. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग करावे लागतील. त्या विभागांवर माणसे नेमावी लागतील. या माणसांची वरच्या स्तरावर एक कोर कमिटी निर्माण करावी लागेल आणि कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी या कोर कमिटीची मतं गृहीत धरली गेली पाहिजेत. या पद्धतीने एखादी टप्प्याटप्प्याची प्रभावी रचना समितीमध्ये होणे गरजेचे आहे.

प्रदीर्घ चाललेला सीमा लढा आता पक्षीय विचारसरणीच्या रोखाने चालला आहे. त्यामुळे समितीच्या कार्यपद्धतीची रचना त्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. जे जुने थकलेले नेतृत्व आहे त्यांनी आपला अनुभव नव्या पिढीकडे संक्रमित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नव्या पिढीने जुन्या -नव्याचा मेळ घालत कार्य प्रणाली नीट समजून घेऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. रमाकांत कोंडुसकर यांच्यासारखे एक तगडे युवा नेतृत्व महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाले आहे. या खेरीज कोंडुसकर यांच्या अधिपत्याखाली असलेली श्रीराम सेना हिंदुस्तान सारखी एक जबरदस्त संघटना समितीच्या खांद्याला खांदा लावून उभी असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद आता दुप्पट झाली आहे. श्रीराम सेनेची काम करण्याची पद्धत ही रचनात्मक असल्यामुळे त्यांच्याकडून प्रभावीरीत्या कार्यप्रणाली राबवून घेणे शक्य आहे. त्याचबरोबर समितीच्या कार्यकर्त्यांनाही त्या पद्धतीचा एका वेगळ्या कार्यप्रणालीचा ढाचा घालून देणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळे सेल करणे गरजेचे आहे. विचारवंतांचा सेल, वैद्यकीय सेल, कायदेशीर सल्लागार सेल, प्राध्यापक -शिक्षक, पत्रकार, रिक्षा संघटना, कामगार संघटना अशा अनेक पद्धतीचे सेल तयार करता येऊ शकतात. हे ध्यानात घेऊन त्या अनुषंगाने कार्य करणे ही काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.