बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक प्रभावी नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो सह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक स्टार प्रचारक निवडणुकीच्या प्रचारात उतरले. मात्र याची जादू कर्नाटकातील जनतेवर न होता बहुमतांनी काँग्रेस पक्ष विजयी ठरला. कर्नाटकात ज्यापद्धतीने काँग्रेसने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली याचा करिष्मा केंद्रात देखील दिसून येईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
यासंदर्भात प्रा. आनंद मेणसे यांनी राजकीय विश्लेषण केले आहे. कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव झाला यामुळे देशभरातील भाजपच्या विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
आता आपण भाजपचा पराभव करू शकतो असा आत्मविश्वास विरोधकांना वाटत आहे. देशभरात भाजप विरोधात १९ समविचारी पक्ष एकवटले आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम,,जनता दल (संयुक्त), आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिव्हल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथैगल कच्छी, मारूमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय लोक दल आदी पक्षांचा समावेश आहे.
२०२४ साली लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत देशभरात भाजपाला ठरविण्यासाठी हे सर्व समविचारी पक्ष एकवटले आहेत. येत्या काही दिवसात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम आदी ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी आघाडी करून एकमेव उमेदवार निवडणुकीत उभा केला तर देशभरात भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे.
सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचेच सरकार आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि मिझोराम मध्ये मिझो नॅशनल फ्रंट या प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे. या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून, आघाडी बनवून एकमेव उमेदवार निवडणुकीत उभा केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत आपली शक्ती कितपत आहे हे कळून येईल.
शिवाय आपली शक्ती किती वाढली हेदेखील कळेल. या चारही राज्यातील निवडणुका आघाडी बनवून व्यवस्थित लढविल्या तर भाजपचा पराभव निश्चित असल्याचे विश्लेषण आनंद मेणसे यांनी केले आहे.