Tuesday, May 14, 2024

/

रांगोळीद्वारे आमदारांना विचारण्यात आला ‘असा’ जाब

 belgaum

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मिक्स्चर, कुकर, साड्या वाटप करून मतदारांना आत्तापासूनच आकर्षित करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करणारी आणि मतदारांची भूमिका स्पष्ट करणारी बेळगुंदी येथे साकारण्यात आलेली रांगोळी सध्या चर्चेचा विषय झाली आहे.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने बेळगुंदी गावात आज शुक्रवारी खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी गावातील बहुतांश घरांसमोर वेगवेगळ्या आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. मात्र या स्पर्धेचा वेगळ्या पद्धतीने लाभ उठवताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी बेळगुंदीचे अध्यक्ष परशराम अमरोळकर यांनी कलमेश्वर गल्लीतील आपल्या घरासमोर अभिनव रांगोळी रेखाटली आहे.

अमरोळकर यांनी या रांगोळीच्या माध्यमातून विद्यमान आमदारांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना विशेष करून मतांसाठी ग्रामीण भागातील महिलांना आमिष दाखविण्याच्या प्रकाराचा निषेध केला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असणाऱ्या रिंग रोड बाबत जाब विचारला आहे.

 belgaum

सदर ‘जय महाराष्ट्र’ या शीर्षकाखाली काढण्यात आलेल्या या रांगोळीमध्ये बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव, हल्ल्याळ, कारवार या सीमा भागाचा नकाशा काढण्यात आला आहे. या नकाशाच्या दोन्ही बाजूला रिंग रोडची जमीन कशी वाचवणार? तुम्ही मत मागणार त्यांनी शाई ओतणार म्हणजे तुम्हीच महाराजांची विटंबना करणार, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मिक्स्चर, कुकर, साड्या वाटून 5 वर्षभर मराठी भाषा संपविण्याचे राजकारण करत आलात… ना कुकर पाहिजे, ना साडी पाहिजे बेळगावात आम्हाला मराठी भाषा वाचविण्यासाठी समिती पाहिजे -तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगुंदी, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिक व शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडणारी ही रांगोळी सध्या चर्चेचा विषय झाली आहे.Protest against mixer

दरम्यान, आपण आयोजित केलेली रांगोळी स्पर्धा पाहण्यासाठी आमदार सकाळी बेळगुंदी गावाला भेट देणार होत्या.आमदार गावाला भेट देणार हे समजताच रिंग रोड संदर्भात जाब विचारण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने बस स्टॅन्डच्या ठिकाणी शिवाजी चौकात जमा होऊन आंदोलन छेडले होते.

मात्र या आंदोलनाची माहिती मिळताच आमदारांनी आपली बेळगुंदी भेट रद्द करून आपले प्रतिनिधी  कदम यांना त्या ठिकाणी पाठवले असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.