Friday, March 29, 2024

/

सुकन्या’मुळे बेळगाव टपाल खात्याला कोट्यावधीचा महसूल

 belgaum

बेळगाव टपाल खात्याने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या योजनेअंतर्गत 2015 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत बेळगाव टपाल खात्यात 60,931 जणांनी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडली आहेत. यामुळे बेळगाव टपाल खात्याला कोट्यावधीचा महसूल प्राप्त झाला आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मासिक 250 रुपयांपासून वार्षिक 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत भरणा करता येतो. सुकन्या योजनेमुळे बेळगाव पोस्ट खात्याला समृद्धी मिळाली असून एक मार्च 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या नऊ महिन्याच्या कालावधीत 227 जणांनी खाते उघडले आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा जमा करण्यास प्रोत्साहन देते.

या योजनेच्या माध्यमातून ठेवीवर अधिक व्याज मिळत असल्याने ठेवीदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे बचत अधिक सुरक्षित असल्याने या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्ट खात्याने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली असून या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. सदर योजना अधिकाधिक लोकप्रिय होण्याबरोबरच या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक लाभावा यासाठी ठेवीवर अधिक व्याज देण्यात येत आहे.

 belgaum

मुलीच्या 0 ते 18 वर्षे वयापर्यंत या योजनेचे खाते चालते. मुलीच्या 10 व्या वर्षापर्यंतच खाते उघडण्याची मुभा आहे. 250 रुपये भरून खाते उघडावे लागते. मुलीच्या 18 वर्षापर्यंत खात्यावर रक्कम भरणे आवश्यक आहे 21 वर्षापर्यंत शिक्षण व लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे. 21 वर्षानंतर खाते बंद करता येते. दरम्यानच्या काळात दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाल्यास त्याच्या आई-वडिलांना ही रक्कम कधीही काढता येऊ शकते. मासिक 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येत असली तरी जेवढी रक्कम कमी तेवढा परतावा तसेच व्याज कमी असते.Sukanya scheme post

सुकन्या समृद्धी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेअंतर्गत व्याजाचा दर 7.6 टक्के इतका आहे. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणात व लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. योजनेतील आपले खाते 21 वर्षानंतर बंद तर करता येतेच शिवाय 18 वर्षानंतर मुदतपूर्व देखील खाते बंद करता येऊ शकते. रक्कम जमा करण्याच्या वारंवारितेवर बंधन नाही. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी ज्यादा कागदपत्रांचीही गरज नाही. फक्त मुलीचा जन्म दाखला, आई किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि दोन छायाचित्रे आवश्यक असतात.

बेळगाव टपाल विभागात एकूण पाच तालुक्यांचा अंतर्भाव असून या सर्व ठिकाणी मिळून 2015 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 60,931 जणांनी सुकन्या योजनेची खाती उघडली आहेत खानापूर मधील काही गावे सुकन्या समृद्धी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत या योजने संदर्भात बोलताना बेळगाव टपाल कार्यालयाचे अधीक्षक विजय नरसिंहा यांनी सुकन्या समृद्धी योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टाकडून याची जागृतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. बेळगाव टपाल विभागात असलेल्या प्रत्येक कार्यालयात या योजनेची माहिती तसेच खाते उघडले जात आहे, अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.