Friday, April 19, 2024

/

‘रोहयो’ मध्ये बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम

 belgaum

बेळगाव जिल्हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात राज्यात प्रथम क्रमांकासह अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याने 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षात 1 कोटीहून अधिक मानव दिन पूर्ण करून 305.23 कोटी रुपये मजुरी वितरित केली आहे.

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम आणि रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार रोजगार हमी योजना (रोहयो) राबवते. बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायती अंतर्गत रोहयो कामे सुरू असून याचा मोलमजुरी करणाऱ्या महिला, पुरुष व शेतकरी लाभ घेत आहेत. जिल्ह्यात एकूण 7.85 लाख रोजगार साधनांचे (किट) वितरित करण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत नवे तलाव निर्माण, अमृत सरोवर, तलावातील गाळ काढणे, आमचे शेत आमची वाट (शेताला जाणारा) रस्ता, पंचसूत्र अंतर्गत शाळेला संरक्षक भिंत, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हर्स बसवणे, वन प्रदेशाचा विस्तार, पाण्याचा दर्जा व मातीचा पोत सुधारणे अशी कामे, व्यक्तिगत कामांतर्गत शेततळे बांधणे, खंदक बुजविणे, शेतीचा विकास, मोरी तयार करणे आदी विकास कामे हाती घेण्यात येत आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत सलगपणे 1.10 कोटी मानव दिन राबविण्यात आले असून यंदा म्हणजे या डिसेंबर अखेरपर्यंत 1 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मानवदिनांचे परीक्षण केल्यास राज्यात बेळगाव जिल्हा प्रथम स्थानी असून त्यानंतर रायचूर जिल्हा दुसऱ्या, कोपळ तिसऱ्या तर विजापूर व बळ्ळारी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी उपरोक्त माहिती दिली. तसेच आगामी तीन महिन्यात वार्षिक उद्दिष्टांपेक्षा अधिक मानव दिन काम पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.