Saturday, July 27, 2024

/

बेघर वृद्ध दांपत्याला ‘यांनी’ दिला मदतीचा हात

 belgaum

मुलगा व सुनेने घराबाहेर काढल्यामुळे रेल्वेने बेळगाव येथे पोहोचलेल्या आणि असहाय्य बेघर अवस्थेत रस्त्याकडेल्या बसलेल्या एका वृद्ध जोडप्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मूळ गावी धाडल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली.

याबाबतची माहिती अशी की, महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील एका वृद्ध जोडप्याला त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले. त्यानंतर बेघर झालेल्या त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले.

या जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी रस्त्याकडेला आसरा घेतला होता. बेघर झालेले हे जोडपे आज सकाळी रडत बसलेले पाहून एका विद्यार्थ्याने त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच याची माहिती सुनंदा पाटील आणि समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांना दिली.Madhuri Jadhav

माधुरी जाधव यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन त्या जोडप्याची चौकशी केली असता त्यांनी आपले नांव अंबर साळुंखे (वय 75) आणि कौशल्या साळुंखे (वय 65) असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे काही ओळखपत्रही नव्हते. त्यानंतर माधुरी जाधव यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी डोली सर आणि शिवानंद सर यांच्याशी संपर्क साधून त्या जोडप्याबद्दल मिळालेली माहिती त्यांना दिली.

सदर माहिती मिळतात टिळकवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बसवेश्वर सर्कल येथे दाखल होऊन त्या जोडप्याची संपूर्ण चौकशी केली. तसेच त्यांना सुखरूपपणाने त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वृद्ध साळुंखे जोडप्याला त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आली. याकरिता समाजसेवक विजय शिंगोटे, व हेमंत पाटील यांचेही सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.