छ. शिवाजी महाराजांना फार काळ आग्रा येथे डांबून ठेवणे मोगलानाही शक्य झाले नाही. मात्र बेळगाव शहरातील शिवसृष्टीमध्ये गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ शिवरायांची मूर्ती कोंडून पडली आहे. महाराजांच्या मूर्तीची ही एक प्रकारे विटंबनाच असून ती खपवून घेतली जाणार नाही. तेंव्हा महिन्याभरात शिवसृष्टी जनतेसाठी खुली करावी अन्यथा श्रीराम सेना तीव्र आंदोलन छेडून ती खुली करेल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवभक्तांनी आज शुक्रवारी सकाळी येत्या महिन्याभरात शहापूर छ. शिवाजी उद्यान येथील शिवसृष्टी जनतेसाठी खुली करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी प्रशासनाला वरील प्रमाणे इशारा दिला आहे. शहरातील छ. शिवाजी उद्यानामध्ये एका बाजूला बुडातर्फे शिवसृष्टी निर्माण करण्यात आले आहे. मात्र गेल्या 10 वर्षापासून ही शिवसृष्टी जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. हे सर्व राजकीय स्वार्थापोटी आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासाठीच केले जात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण शहरात अवघ्या 2 वर्षात ‘खाऊ कट्टा’ निर्माण होतो. मात्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराजांची ‘शिवसृष्टी’ निर्माण करून ती जनतेला खुली करण्यास तब्बल 10 वर्षे लागतात ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे कोंडुसकर म्हणाले.
छ. शिवाजी उद्यान येथील शिवसृष्टीमध्ये शिवरायांसह हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्व मूर्ती आज त्या ठिकाणी बंदिस्त अवस्थेत धुळखात पडून आहेत ही अत्यंत गांभीर्याची अपमानास्पद बाब आहे. छ. शिवाजी महाराजांना मोगलांनी आग्रा येथे काही मोजके दिवस बंदिस्त ठेवले होते. मात्र आज बेळगावात अत्यंत लाजिरवाणी गोष्ट घडत आहे.
महाराजांच्या नावावर निवडून आलेल्या राजकारणी लोकांनीच त्यांना गेली 10 वर्षे कोंडून ठेवले आहे. समस्त शिवभक्त ही विटंबना खपवून घेणार नाहीत. राजकीय व्यक्ती व संबंधित अधिकाऱ्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करू नये. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या मूर्तींची विटंबना थांबवावी. नेतेमंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी थोर महापुरुषांचा वापर करून घेणे बंद करावे. शहापूर येथील शिवसृष्टी जनतेच्या पैशातून उभारण्यात आली आहे. तेंव्हा त्याचे श्रेय स्वतः लाटण्याचा कोणी प्रयत्न करू नये, तसे झाल्यास जनता संबंधितांना ठेचून काढेल असे सांगून प्रशासनाने महिन्याभरात शिवसृष्टी जनतेसाठी खुली करावी, अशी विनंती वजा मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास महिनाभरानंतर समस्त शिवभक्त तीव्र आंदोलन छेडून ती शिवसृष्टी जनतेसाठी खुली करतील, असे रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी कोंडुसकर यांच्या समवेत नंदू इंदुलकर,सचिन चव्हाण,सचिन पाटील, बळवंत शिंदोळकर,राजेंद्र बैलूर,दत्ता जाधव,सागर पाटील,विराज मुरकुंबी आदींसह अन्य पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.