Friday, April 26, 2024

/

नियोजित ट्रक टर्मिनलची पहाणी

 belgaum

बेळगावमधील वाहतुकीसंदर्भात अनेक त्रुटी असून वाहतूक आणि रहदारी संदर्भात अनेक अडचणींचा सामना बेळगावकरांना करावा लागत आहे. वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक, पार्किंगची समस्या यासह रस्ते आणि वाहतुकीशी संबंधित अनेक समस्यांवर नागरिक हितरक्षण समितीसह विविध संघटनेच्या पदाधिकारी आणि रस्ते वाहतूक प्राधिकरण अधिकारी यांची चर्चा पार पडली.

अवजड वाहनांची वाहतूक, अरुंद रस्ते, सतत होणारी वाहतुकीची कोंडी, शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वर्दळ, वाढत्या वाहन संख्येमुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक, आणि पार्किंगची समस्या आणि या साऱ्यांमुळे वाढत चाललेली अपघातांची संख्या.. या साऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने रस्ते वाहतूक प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात चेंबरचे माजी अध्यक्ष, नागरिक हितरक्षण समितीचे जनसंपर्क प्रमुख  विकास कलघटगी यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना या बाबत अधिक माहिती दिली आहे. शहरातील रहदारी, रस्ते आणि वाहतूक तसेच अवजड वाहने यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांच्यासोबत २००६-२००७ साली प्रस्ताव ठेवण्यात आला. आजपर्यंत याच मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत असून आजतागायत बेळगावमधील रहदारीची समस्या प्रलंबित आहे. ८ जुलै २०२२ रोजीही जिल्हाधिकारी कार्यालयात याचसंदर्भात बैठक पार पडली होती त्यानंतर आज रस्ते वाहतूक प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली असून या बैठकीत रस्ते आणि वाहतुकीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाली.

 belgaum

बेळगावमध्ये गेल्या आठवड्यात दोन अपघात झाले. यानंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. यानंतर हि वाहतूक दुसऱ्या मार्गाने, विशिष्ट कालमर्यादेत वळविण्यात आली आहे. परंतु हि वाहतूक देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी अडचणीचीच ठरणार आहे. यामुळे या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच अवजड वाहनांसाठी देसूर आणि होनगा मार्गी म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आणि १३ या मार्गावर ट्रक टर्मिनल निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून या मार्गावर नागरिकांची वर्दळ देखील कमी असते शिवाय वाहनधारकांना पार्किंगची समस्याही उद्भवणार नाही.

Rta meeting

पिरनवाडी व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र मच्छे ते पिरनवाडीपर्यंत रस्त्यामध्ये दुभाजक असल्याने एका बाजूला वाहने थांबविण्यात आल्यानंतर खानापूर व इतर भागातून येणाऱ्या बसेस भर रस्त्यात थांबत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना ताटकळत लागत आहे. या भागातील कारखान्यांची अधिक संख्या, कारखान्यात येणारे कर्मचारी आणि नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात गर्दी असते. यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

अवजड वाहनांवर शहर प्रवेशासाठी बंदी घातल्यानंतर शहराच्या दोन प्रमुख प्रवेशद्वारांवर ट्रक टर्मिनल तयार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि विविध संघटनांतर्फे नऊ जागांची पाहणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या देवराज अर्स ट्रक टर्मिनल विभागाकडे यासंदर्भातील प्रस्तावही पाठविण्यात आला होता. काकती आणि देसूर या ठिकाणी जागाही निश्चित झाली होती. मात्र हा प्रस्ताव कागदावरच राहिला. अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला थांबविण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातदेखील वाढत आहेत. यामुळे अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग शोधून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. शहराच्या दोन प्रमुख प्रवेशद्वारांवर ट्रक टर्मिनल्स ची निर्मिती करण्यासाठी जागेची पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार बुधवारी ९ जागांची पाहणी करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांच्यासह नागरिक हितरक्षण समितीचे  पी आर ओ विकास कलघटगी, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, मालवाहतूक संघटनेचे पदाधिकारी ए ए पाच्छापुरे आदी यावेळी उपस्थित होते.Truck parking service roads

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या जागांची पाहणी करण्यात आली असून भुतारामहट्टी परिसरातील जागेसह हत्तरगी टोल नका येथील जागेची पाहणीही झाली आहे. त्यातील तीन जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून देसूर परिसरातदेखील जागेची पाहणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.