Tuesday, April 23, 2024

/

ग्रामीण शिक्षण अभियान : ‘ऑपरेशन मदत’चा पुढाकार

 belgaum

ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत ‘ऑपरेशन मदत’ या संघटनेने खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ऑपरेशन मदतने तेथील पालकांची बैठक घेतली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

सदर कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल पाटील यांनी गोल्याळी गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कित्येक वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती होत नाही किंवा ग्रामीण भाग असल्याने येथे कोणी शिक्षक म्हणून रूजू होण्यास तयार नसतो. पर्यायी व्यवस्था म्हणून अतिथी शिक्षकांची वेळेवर नियुक्ती होत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण ? सरकार खानापूर तालुक्यातील जिथे जिथे शिक्षकांची कमतरता आहे तिथे -तिथे, त्या -त्या विषयांच्या अनुषंगाने शिक्षकांची लवकर नियुक्ती करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

तालुक्यातील कित्येक शाळांची डागडुजी पावसाळ्यापुर्वी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्जित वैज्ञानिक लॅब, प्रोजेक्टरसह संगणक प्रशिक्षण विभाग, क्रिडा प्रशिक्षकांसह खेळाचे साहित्य व त्या विभागात तज्ञ शिक्षकांच्या नियुक्त्या नेमणूका कधी होणार? अभ्यासक्रमाचे अध्ययन विद्यार्थी कधी करणार? याबाबत सर्वच आलबेल आहे असे सांगून याकडे कोणी लक्षात घेईल का ? खानापूर तालुक्यातील शैक्षणिक अधिकाऱ्यांनी या विषयावर गंभीरतेने विचार केला पाहिजे. तथापी ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत आम्ही दुर्गम भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.Education

 belgaum

गोल्याळीच्या सरकारी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 2 मराठी शिक्षक, 1 कन्नड शिक्षक व 1 क्रिडा शिक्षकांची गरज आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी वारंवार संबंधितांसमोर आपल्या समस्या मांडूनही कांही फरक पडलेला नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून पालकांनी थेट तालुक्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना गाठून त्यांच्या समोर समस्या मांडल्या व निवेदने दिली आहेत.

श्री साईनाथ स्व-सहाय्य संघाच्या महिला कार्यकर्त्या, गोल्याळी गावातील विद्यार्थ्यांचे पालक व एमएचपीएस गोल्याळी, शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष रामलिंग गावस यांच्या मार्फत महिलांनी खानापूर तालुक्याचे बीईओ यांना निवेदन सादर केले आहे. त्याचप्रमाणे गावच्या महिलांनी प्रथमच घराबाहेर पडून स्व-सहाय्य संघाच्या माध्यमातून प्रेरीत होऊन आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खानापूच्या आमदार, तहसिलदार, सीआरपी, गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शाळा सुधारणा कमिटी यांनाही निवेदने दिली आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे पीडिओ यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. गोल्याळी शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी सुजाता गुरव, सरस्वती चौगुले, संजना गुरव, पुनम चौगुले, अश्वीनी गुरव, सुवर्णा सावंत, साधना गुरव, लीला दळवी, रुपाली गुरव, सत्यभामा चौगुले, दर्शना गुरव, आरती चौगुले व कविता गुरव आदींसह पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.