Sunday, September 1, 2024

/

एकीकडे टंचाई, दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया

 belgaum

एकीकडे गेल्या दहा दिवसापासून बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार शहरात पहावयास मिळत आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी काल सोमवारी शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. तथापि संबंधित अधिकारी मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात कचुराई करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील भांदूर गल्ली येथे एका ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गटार बांधकामावेळी खोदकाम करताना सदर जलवाहिनी फुटली असून आज दुपारपर्यंत त्याकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयात पुरेसे पाणी आहे परंतु एल अँड टी कंपनीच्या अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे पाणीपुरवठ्यामध्ये सतत व्यत्यय येत आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या गळत्या माध्यमांनी जाहीर केल्यानंतरच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाग येते. शिवाय स्मार्ट सिटीच्या कामामुळे गळत्या सुरू झाल्याचे सांगून कंपनी जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला जात आहे.Water leakage

दरम्यान गेल्या 8 -10 दिवसापासून शहर आणि उपनगरातील पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. हनुमाननगर, सदाशिवनगर आदी भागात 8 -8 दिवस झाले नळाला पाणी नाही. परिणामी नागरिकांना एक तर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे किंवा बाजारातून पाणी विकत आणावे लागत आहे.

सदर पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा मात्र तेजीत आहे. नागरिकांना नाईलाजाने टँकरच्या पाण्यावर आपली गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर गल्लीत आल्यानंतर पाणी घेण्यासाठी घागर, कळशा, बादल्या घेऊन नागरिक व महिलांची एकच झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या बहुतांश ठिकाणी पहावयास मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.